वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे-कापशी येथे तीव्र पाणी टंचाई- लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील कापसी बु. येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे, गावातील दोन डीपी वरून शेतातील कृषी पंपांना कनेक्शन दिल्याने येथील ओव्हर लोडमुळे मागील 2 आठवड्यापासून थ्री फेज वीज पुरवठा बंद असल्याने गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर आठवड्यातच 2 वेळेस डीपी बसूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांतून वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या बाबतीत लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी लक्ष द्यावे जनतेची मागणी कापसी बु.बाजार पेठेचे गाव असून, गावातच 33 केव्ही उपकेंद्र आहे. मात्र येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे सतत वीज गुल होत असते. कापशीत 2 डिपी असुनही त्यावरून शेतीसाठी असलेल्या कृषी पंपाना गावातून वीज जोडणी दिल्यामुळे येथील ओव्हर लोडमुळे सदर डिपी जळाल्या त्यामुळे गावात मागील 2 आठवड्यापासुन थ्री फेज वीज पुरवठा खंडीत असल्याने सार्वजनिक पाणी पुरवठा बंद असून गावात पिण्याच्या पाण्यासाठी हिवाळ्यातच भटकंती करण्याची वेळ आली आहे.
वीजपुरवठा पुर्ववत करणे बाबत एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून ही उपयोग होत नसल्याच्या तक्रारी आहेत, आता संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी शिवाजी आळणे यांनी दिली.
याबाबत कर्मचाऱ्यांशी विचारले असता आज लाईट येईल एवढेच ते मोघम उत्तर देत आहेत.मात्र अद्यापही डिपी दुरुस्ती झाली नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर पाणी प्रश्न बनला आहे.