सुरेश पाटील यांची भारतीय जैन संघटनेच्या (BJS) नूतन राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : चाळीस वर्षांची प्रदीर्घ व समृद्ध परंपरा असलेल्या भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी राजस्थान येथील उदयपूर मध्ये संपन्न झाले. याप्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी, राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड, प्रदेश अध्यक्ष राजकुमार फतावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनी भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सांगलीचे माजी महापौर व बीजेएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील यांची घोषणा केली.
या संमेलनात संपूर्ण भारतातून ४००० पेक्षा ही अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. सुरेश पाटील हे गेल्या ३० वर्षांपासून बीजेसच्या माध्यमातून समाजसेवा करीत आले आहेत. भारतीय जैन संघटना ही दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी व सर्व जैन धर्मपंतीय सर्वोच्च सामाजिक संघटना असून देशात २२ राज्यात सध्या कार्यरत आहे. भारतीय जैन संघटनेने गेल्या ४० वर्षात संपूर्ण देशभरात सामुहिक विवाहाची सुरवात, परिचय संमेलन, मोफत प्लास्टिक सर्जरी, पदयात्रा, शैक्षणिक संस्थांची पुनर्बांधणी, वाघोली शैक्षणिक औपचारिक सुरुवात, लातूर भूकंप मधील १२०० मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन, शांती यात्रा, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांचे पुनर्वसन, पूर मदत महाराष्ट्र आणि बिहार, निकोबार बेटांवर ११ शाळा आणि ३४ प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रांची पुनर्बांधणी, मूल्यवर्धन, रौप्य महोत्सवी अधिवेशन, दुष्काळमुक्त आंदोलन, सुजलाम सुफलाम् धोरणात्मक भागीदारी- निती आयोग विस्तार, सरकारी उपक्रमांना समर्थन देण्यासाठी जलसंस्था आघाडीवर असे अनेक उपक्रम राबविलेले आहेत.
महाराष्ट्रात कोविड संक्रमण काळात जनसामान्यांच्या उपचारांसाठी महिला वसतिगृहाला ‘ भगवान महावीर कोविड हॉस्पिटल ‘ मध्ये तात्पुरते रूपांतरित करून ५०० पेक्षाही अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. अशा पद्धतीने अनेक सामाजिक समस्यांवर मात करण्यासाठी सुरेश पाटील यांनी दिलेले उत्स्फूर्त योगदान आणि बीजेएस सोबत केलेले निरंतर सहकार्य लक्षात घेता त्यांची बीजेएसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या राष्ट्रीय अधिवेशनात दोन दिवसीय कार्यक्रमात शिक्षणाची मूल्ये, देशात पाण्याच्या स्रोतांचा विकास, पाण्यासारख्या गंभीर व जटिल समस्येवर उपाययोजना आणि स्मार्ट गर्ल्स प्रोग्राम यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे भारत सरकार व बीजेएस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ राज्यांमधील १०० जिल्ह्यांमध्ये जलसंधारणा द्वारे “जलयुक्त जिल्हा” बनविण्यासाठी एक सामंजस्य करार केला गेला आहे. सुरेश पाटील यांच्याकडून सामाजिक विकासासाठी केल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण कार्यांची नोंद घेऊन त्यांच्याकडे संपूर्ण देशव्यापी संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली आहे – याबद्दल समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, वसंत पाटील, धन्यकुमार शेट्टी, अविनाश चौगुले, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.