केंद्र सरकारची पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत सुरु केलेली मोफत धान्य योजना बंद :त्याऐवजी रेशनचे नियमित धान्य मिळणार मोफत
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरु केलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य योजना 31 डिसेंबर पासून बंद करण्यात आली आहे. त्या ऐवजी आता नियमित धान्य योजनेतून देण्यात येणाऱ्या रेशनच्या गहू व तांदळाचे मोफत वाटप केले जाणार आहे.1 जानेवारीपासून ही योजना सुरू झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात लाखो लोकांवर बेरोजगारीची कुराड कोसळली होती, रोजगार गेल्यामुळे कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात, मुलांना दोन वेळेचे अन्न कुठून आणावे,असे एक ना अनेक प्रश्न लोकांना भेडसावत होते.या दरम्यान गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मोफत धान्य योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने या योजनेला दोन वेळा मुदतवाढ दिली होती.मात्र 31 डिसेंबर पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या ऐवजी नियमित धान्य योजना म्हणजेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो गहू दिले जाते, ते आता पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.त्यासाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागणार नाहीत.