पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानी बना: प्रा.जाधव
प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : “पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे आहेच पण त्याला व्यवहारिक आचारांची विचारांची जोड हवीच तर सर्वकाही सुरळीत होते. म्हणून विद्यार्थ्यांनी माहितीचे रूपांतर ज्ञानात केले पाहिजे. व त्याचे धडे विद्यार्थी दशेतच घेतले पाहिजेत” असे आवाहन प्राध्यापक कुंडलिक जाधव यांनी केले. विद्यामंदिर मंदूर (तालुका गगनबावडा) आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंदुर गावचे सरपंच नामदेव कांबळे होते.
कोल्हापूर जिल्हा परिषद तर्फे देण्यात येणारे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी,नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक कुंडलिक जाधव,आदर्श शिक्षक अशोक पाटील, सरपंच नामदेव कांबळे,उपसरपंच शोभा पाटील, गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सुनील नांदगावकर, सरपंच नामदेव कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन बाजीराव जाधव तर आभार प्रदर्शन सतीश चौगुले यांनी केले.
कार्यक्रमाला मंदूर शाळेचे मुख्याध्यापक श्रावण कांबळे, संजय देसाई,बबन नांदगावकर, कृष्णा जाधव,रूपाली कुंभार, ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.