ख्रिस्ती समाजावरील अन्याय दूर करा : पृथ्वीराज पाटील; मोर्चाला जाहीर पाठिंबा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २१ : ख्रिस्ती समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध या समाजाने आज मोर्चा काढून आवाज उठवला त्यांना सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या नेत्या शैलजाभाभी पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील या ख्रिस्ती बांधवांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या.
श्री. पाटील यांनी ख्रिस्ती समाज बांधवांना निवेदन देऊन हा पाठिंबा दर्शवला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. देशाच्या उज्ज्वल जडणघडणीत आरोग्य, शिक्षणासह इतर बाबींतही या समाजाचे योगदान मोठे आहे.
आजकाल धर्मा-धर्मात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा जो अट्टाहास आणि प्रयत्न आहे तो निंदनिय आहे. सर्वधर्म समभाव हे आपल्या देशाचे उज्ज्वलतेचे प्रतिक आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, ख्रिस्ती समाजाच्या न्याय मागणीकडे व त्यांच्यावर होणा-या अन्यायाकडे सरकारने लक्ष द्यावे.
या समाजावर कधी धर्मांतराचा आरोप, कधी प्रार्थना स्थळाची मोडतोड, मंदिरातील वास्तूंची नासधूस, पवित्र प्रथांची विटंबना इतकेच नाहीतर मंदिरात विधी चालू असताना धर्मगुरु व समाज बांधवाना मारहाण करणे यासारख्या गोष्टींना हा समाज बळी पडत आहे. ख्रिस्ती समाजावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे या समाजामध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आढळते.
सांगली येथे ख्रिस्ती समाजाच्या न्याय हक्कासाठी म्हणुन समस्त ख्रिस्ती बांधवांच्यावतीने शांती मुक मोर्चा काढण्यात आला. त्यास सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहिर पाठींबा देत आहोत.
या मोर्चामध्ये नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार, करण जामदार, विजय आवळे, सनी धोतरे, उमेश वायदडे, अनिकेत गायकवाड, यांनी हे निवेदन ख्रिस्ती बांधवांना दिले.