तासगावकरांनो स्वतःच्या दुचाकी सांभाळा ; दुचाकी चोरीचा शोध घेणे हे आपले कामं आहे हेच पोलीस विसरले आहेत काय?
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे,एकदा चोरीला गेलेली गाडी परत मिळेल,याची काहीच शाश्वती राहिली नाही. पोलिसांत तक्रार दाखल करून प्रतीक्षा करण्याशिवाय वाहन मालकाना पर्याय राहिला नाही. पोलीस तपास शून्य असल्याने चोरट्यांची वाहनचोरी अगदी जोमात सुरू आहे.शहरात गेल्या 10 ते 12 दिवसांत अनेक दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.एखाद्या ठिकाणी मोटारसायकल उभी करणे हे जोखीम पत्करण्यासारखेच आहे.शहरामध्ये मोटारसायकल चोरट्यांची टोळीच सक्रिय असल्याचें दिसून येत आहे.शहरात दररोज कुठे ना कुठे मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविली जाते. पोलीस तक्रार नोंदवून घेतात; परंतु नंतर त्या तक्रारीचे काहीच होत नाही. महागड्या मोटारसायकलचा अनेक वर्षांपर्यंत शोधच लागत नाही.अनेक लोक तर मोटारसायकल चोरीला गेली तर पोलीस ठाण्यात तक्रारही देत नाहीत.पोलीस एका बाजूला लोकांकडे परवाना (लायसन्स) नसल्यामुळे,हेल्मेट सक्तीच्या नावाखाली, पार्किंगच्या नावाखाली दंड वसूल करतात मात्र दुसऱ्या बाजूला वाहन चोरीचा तपास का लागत नाही?असाही प्रश्न नागरिकांच्यातून उपस्थित केला जात आहे.शहारामध्ये दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून हे दुचाकी चोर अट्टल गुन्हेगार असल्याचा अंदाजही नागरिकांनी व्यक्त केला आहे.तरीही पोलीस याबाबत कोणतीच ठोस अशी कारवाई करीत नसल्याचे दिसून आल्यानेच दुचाकी चोरांचा चोरी करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.वाहन चोरीला गेल्यावर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली तरी तपासाबाबत फारशी हालचाल केली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे.मुळात दुचाकी चोरीचा शोध हे आपले काम आहे,हेच पोलिस विसरून गेले आहेत.दुचाकी चोरणाऱ्या टोळ्या तासगाव तालुक्यात सक्रिय असून दुचाकी चोरीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांनी केवळ चोरीचा गुन्हा दाखल करून न घेता चोरांना पकडण्यासाठी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी वाहन मालकांनी केली आहे.