माझे कार्यालय शेतकऱ्यांसाठी नेहमी उघडे असेल : प्रभाकर (बाबा) पाटील; द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे.देशातील विविध फळ पिकांपैकी द्राक्ष हे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक उत्पादन होते.त्यातही प्रामुख्याने नाशिक पाठोपाठ सांगली जिल्ह्या द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे.तासगाव हे द्राक्ष निर्मिती आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. इथला शेतकरी प्रयोगशील आहे. सातत्यपूर्ण संशोधनातून वेग वेगळ्या जातीं विकसित केल्या आहेत. ही समृद्धी कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक थांबली पाहिजे.या द्राक्षक्रांतीने सांगली जिल्हा महाराष्ट्रातील आघाडीच्या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यात समाविष्ट झाला आहे. ‘तास-ए-गणेश’ ही द्राक्षाची जात म्हणजे,तासगावच्या शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेची देणगी आहे.ऊस पिकाला पर्यायी पीक म्हणून द्राक्ष शेतीकडे बघितले जाते. परंतु द्राक्षासाठी अनुकूल असणारे हवामान सर्वत्र सारखे नाही.त्यामुळे प्रामुख्याने द्राक्ष शेती ही महाराष्ट्रातील काही मोजक्याच प्रदेशात केंद्रीत झाली आहे.त्यामध्ये आपल्या तासगाव चा समावेश आहे.ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
द्राक्ष हे बहुवार्षिक नगदी पीक आहे. एकदा द्राक्ष बाग लावल्यानंतर पुढे दहा ते पंधरा वर्षे त्यापासून उत्पन्न मिळते,मात्र त्याबरोबरच त्याचा उत्पादन खर्च देखील जास्त असतो. शेतकऱ्यांना वर्षभर यासाठी आर्थिक नियोजन करावे लागते.द्राक्ष शेतीसाठी लागणारी खते,औषधे,संजीवके व मजुरीमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे खर्चात देखील वाढ झाली.द्राक्ष पीक हे वातावरणातील बदलास अतिशय संवेदनशील असून पाऊस,गारपीट या संकटाला झगडून शेतकरी दर्जेदार द्राक्ष तयार करतात; परंतु बाजारपेठेत दर मिळत नसल्याने द्राक्ष शेतकरी हतबल होतात.अशावेळी व्यापारी जर शेतकऱ्यांना गंडा घालत असतील तर ही गंभीर बाब आहे.सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार हा लहान शेतकरी ते मोठा शेतकरी अशा प्रकारचा आहे.जिल्ह्यात प्रामुख्याने खाण्यासाठी लागणारे द्राक्षे पिकवली जातात.त्याबरोबरच इथे मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती प्रकल्प आहेत.मात्र द्राक्ष व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक ही गंभीर बाब आहे.इथून पुढे या प्रकरणाकडे माझे गांभीर्याने लक्ष असेल,प्रशासनानेही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.जर शेतकऱ्यांची अशी जर फसवणूक व्हायला लागली, तर निश्चित याचा परिणाम इथल्या उत्पादनावर होऊ शकतो.यासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.शेतकरी,प्रशासन आणि व्यापारी यांच्या समन्वयातून यावर निश्चित मार्ग काढू.तासगाव तालुक्यात आता द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे.द्राक्ष खरेदीसाठी देशभरातील व्यापारी तालुक्यात दाखल झाले आहेत.गेल्या चार वर्षांत द्राक्ष खरेदी करून तालुक्यात तब्बल १३ कोटी ६१ लाख रुपयांना गंडा घालण्याचे काम काही व्यापाऱ्यांनी केले आहे.शेतकऱ्यांना दररोज नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो.तळ हातावरच्या फोडाप्रमाणे बाग जपावी लागते. व्यापारी,जर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असतील,तर याचा फटका भविष्यात येथील द्राक्ष उत्पादनाबरोबरच,व्यापा-यांनादे खील बसेल.लोकांनी सुद्धा दक्ष राहावे, व्यापा-यांच्या नोंदी ठेवाव्यात.काही अडचण आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा.माझे कार्यालय शेतकऱ्यांसाठी नेहमी उघडे असेल. द्राक्षाच्या माध्यमातून आत्ता कुठे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.घरात समृद्धी नांदू लागली आहे.ही समृद्धी कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी होतो आणि इथून पुढच्या काळात सुद्धा राहणार असल्याचे भाजपा युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.