लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता मिळेपर्यंत माघार नाही : राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशनात एक मुखी घोषणा
प्रतिष्ठा न्यूज
बिदर प्रतिनिधी : कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे जागतिक लिंगायत महासभेचे मार्च ४ व ५ रोजी राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनास कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गोवा, दिल्ली, या शिवाय अनेक देशात असलेले हजारो समाज बांधव उपस्थित होते. विविध राज्यातील २०० हून अधिक धर्मगुरु मठाधिश आले होते. या सर्वांनी लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता मिळेपर्यन्त संघर्ष सुरुच ठेवणार, माघार घेणार नाही असा एकमुखी निर्णय जाहिर केला. दि. ०४/०३/२०२३ रोजी परुषकटटा येथून अधिवेशन स्थळापर्यन्त सर्वाध्यक्ष श्री गो. रु. चन्नबसप्पा यांची मिरवणूक काढण्यात आली. अधिवेशनाचे उदघाटन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्री. अरळी नागराज यांच्या हस्ते झाले. त्यांनी अलीकडच्या काळात न्याय व्यवस्था ही भारतीय नागरीकांची विश्वासार्हता गमावत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे न्यायालयाची पायरी न चढता संघर्षातून लिंगायतांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून घ्यावा असे म्हटले. सर्वाध्यक्ष श्री गो.रु. चन्नबसप्पा यांनी यांनी लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म असून तो स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा पुरस्कार करतो, लिंगायत समाजाने राष्ट्राच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले आहे, त्यामुळे केंद्र सरकारने आमची मागणी मान्य करुन आम्हांस अल्पसंख्याक दर्जा दयावा असे आवाहन केले. यावेळी ” जगदगल” नावाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
उदघाटनानंतर ‘ लिंगायत समाजाचे संघटन, जाती-उपजातींचे एकीकरण आणि आचरण यामध्ये मठाधिश, महिला व युवक यांचे पात्र या विषयी चर्चा कराण्यात आली. या विषयी पूज्यश्री शरच्चंद्र महास्वामी, पूज्यश्री शरणबसव देवरु, पू. गंगाबिका, पू.अन्नपूर्णा, श्री रायचंद्र रवीकुमार, श्री राजशेखर नारीनाळ, विश्वाराध्य सत्यंपेटे, प्रा. भीमराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस. एम. जामदार आणि राज्य मागास वर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष सी एस द्वारकानाथ यांनी लिंगायत आणि आरक्षण याविषयी अभ्यासपूर्वक मांडणी करताना लिंगायताना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर त्यांना आज मिळणारे आरक्षण जाणार नाही हे ध्यानात ठेवावे. कांही लोक जाणीवपूर्वकअपप्रचार करुन समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यापासून सावध रहावे असे सांगितले. या अधिवशनात महाराष्ट्रातील माजी खासदार श्री राजू शेटटी हे उपस्थित राहून पुढील काळात लिंगायत स्वतंत्र धर्म मागणीसाठी लोकसभेत आवाज उठवीन असे आश्वासन दिले.
या सत्रात जगद्गुरू डॉ. तोंतड सिद्धलिंग महास्वामी, गदग, पूजाश्री डॉ. बसवलिंग पट्टदेवरु आप्पाजी, भालकी, महिला जगदगुरु गंगा माताजी, प्रा. श्री. पंडितराध्य शिवाचार्य महास्वामी, पं. कोरणेश्वर स्वामीजी, उस्तुरी, पी.ओ. सांगनबसवा स्वामीजी, तेलंगा, पू स्वामीनाथ स्वामीजी,सोलापूर उपस्थित होते.
समारोप समारंभात सर्वानुमते बारा ठराव घेण्यात आले. १) केंद्र सरकारने महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करावी. २) दिल्ली येथे नव्याने निर्माण होत असलेल्या संसद भवनास अनुभव मंटप असे नामकरण करुन मुख्यव्दाराशी म. बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यात यावा. ३) लिंगायत धर्मास अल्पसंख्याक धर्म म्हणून केंद्र सरकारने मान्यता दयावी. ४) शरणांचे साहित्य राज्य व केंद्र सरकारने शालेय विदयापीठ स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. ५) बसवकल्याण हे राष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून घोषित करुन केंद्र सरकारने त्याचा विकास करावा. ६) विश्वगुरु बसवण्णा यांना कर्नाटकचे सांस्कृतिक नायक म्हणून घोषीत करावे. ७) लिंगायत धर्माच्या तत्वांनुसार खरे लिंगायत विधी पाळावेत. ८) जणगणना अगर इतर कोणतेही सर्वेक्षण करताना नोंद धर्माच्या स्तंभात केली जावी. ९) राज्य सरकारनी ‘शरण क्षेत्र विकास’ प्राधिकरण स्थापावे आणि शरणक्षेत्रांच्या विकासादरम्यान जागतिक लिंगायत सभेच्या इच्छेनुसार विकास कामे हाती घ्यावीत. १०) सिध्दांताचा प्रसार करणारे वचन विदसयापीठ स्थापन केले जावे. ११) बसव कल्याणातील परुष कटटा यांच्याशी लिंगायताचे भावनीक नाते आहे त्याचे जागतिक दर्जाच्या स्मारकात रुपांतर होणे गरजेचे असून त्यासाठी परुष कटटा परिसरात नवीन इमारती बांधण्यास परवानगी देऊ नये. १२) लिंगायत धर्माला घटनात्मक मान्यता देणेसाठी अंमलबजावणी व्हावी. सोलापूर जिल्ह्यातून विजयकुमार हत्तुरे,सिंधुताई काडादी, राजश्री थळंगे, विजयकुमार मुलगे, कोल्हापूर जिल्ह्यातील राजशेखर तंबाके, मिलींद साखरपे सांगली जिल्ह्यातून राष्ट्रीय लिंगायत संघ चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप बापू वाले, केंद्रीय समन्वयक संजय हिरेकर पुणे जिल्ह्यातून बसवराज कणजे, नरसिंग मुळे,व लातूर जिल्ह्यातून विजयकुमार शेटे हजर होते.