कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे माणसे आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही व पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. या बैठकीत त्यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या योजनांचा आढावा घेतला. कोयना धरणात 11.74 टीएमसी तर वारणा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे 9 पंप सुरू असून 12 टीएमसी पाणी उचलले गेले आहे. तर ताकारी योजनेतून 4.85 टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून 7.20 टीएमसी पाणी उचलले आहे. तर नदीवरील उपसा 21 टीएमसी असा एकूण 45 टीएमसी पाण्याचा उपसा झालेला आहे. कोयनेतून 1050 क्युसेक्स पाणी सोडणे सुरू असले तरी नदीतील डोह भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाहीत होत नाही त्यामुळे नदीपात्रात पाणी अत्यंत अत्यल्प आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे सद्यस्थितीत आवश्यकच असल्याने उपसा बंदी लागू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. म्हैसाळ योजनेतील रखडलेले पाईपलाईनचे काम तातडीने मार्गी लावा त्यासाठीचा आवश्यक ड्रोन सर्व्हे, मोजणी करून घ्या. भूसंपादनासाठी नोटीसा बजावा, कागदोपत्री प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून घ्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, जेथे तलावातून पाणी पुरवठा होतो तेथे यंत्रणांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेवून पाण्याची स्थिती लोकांना समजावून सांगावी आणि तलाव कोरडे पडू नयेत यासाठी तातडीने लोकांना विश्वासात घेवून पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी त्यांनी आवश्यकता भासल्यास टँकरची तजवीज करा, त्यासाठी आराखडे तयार करा. गावनिहाय पाण्याचा उपलब्धतेचा अहवाल तयार करा पण कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या, असे सांगितले.