सत्ताधारी गटाने कट कारस्थान सुरु ठेवल्यास जशास तस उत्तर देऊ वायफळेचें उपसरपंच पंकज नलवडे
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : वायफळे ग्रामपंचायतीने एप्रिल 2022 मध्ये खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून व्यायाम शाळेसाठी सुमारे 7 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा विभागाकडे पाठवला होता.मात्र हा प्रस्ताव रद्द करावा,असे पत्र विद्यमान सरपंच नलवडे यांनी जिल्हा क्रीडा विभागाला दिले आहे,असा आरोप उपसरपंच पंकज नलवडे यांनी केला. सरपंच संतोष नलवडे हे सत्तेच्या जोरावर गावातील विकासकामाला ‘खोडा’ घालत आहेत,असा आरोप पंकज नलवडे यांनी केला आहे.
वायफळे ग्रामपंचायतीवर खासदार संजय काका पाटील गटाची सत्ता होती. सत्तेच्या काळात त्यांनी एप्रिल 2022 मध्ये खासदार पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा विभागाकडे व्यायाम शाळेचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात होता,या प्रस्तावाच्या माध्यमातून व्यायाम शाळेला सुमारे 7 लाख रुपये मिळणार होते.मात्र सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत सत्ता बदल झाला. भाजपची सत्ता जाऊन याठिकाणी राष्ट्रवादीचे सत्ता आली.सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीने सरपंच संतोष नलवडे यांना पुढे करून 23 मार्च 2023 रोजी जिल्हा क्रीडा विभागाला एक पत्र पाठवले.एप्रिल 2022 मध्ये जो व्यायामशाळेचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता तो रद्द करण्यात यावा,अशा आशयाचे हे पत्र होते.शिवाय आम्ही क्रीडा सुविधा निर्मिती या योजनेतून नवीन क्रीडा उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत,असेही या पत्रात म्हटले होते. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा,असे सांगण्यात आले होते.दरम्यान, भाजपचे विद्यमान उपसरपंच पंकज नलवडे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीत येऊन सरपंचांना याबाबत जाब विचारला.खासदार पाटील हे आमचे नेते आहेत.त्यांच्या पत्रावर आम्ही हे काम मंजूर करून आणत आहोत. व्यायाम शाळा गावातच होणार आहे. त्याचा फायदा गावातील तरुणांना होणार आहे.गावात एखादे विकास काम होत असताना तुम्ही राजकीय हेतूने त्याला विरोध का करता हे काम रद्द करण्याबाबतचे पत्र तुम्ही क्रीडा विभागाला का दिले,अशा प्रश्नांची सरबत्ती करत सरपंच नलवडे यांना धारेवर धरले.यानंतर सरपंच नलवडे यांनी पुन्हा दुसरे पत्र जिल्हा क्रीडा विभागाला देऊन,व्यायाम शाळेच्या प्रस्तावाला आमचा काहीही विरोध नाही,असे सांगितले.याबाबत उपसरपंच पंकज नलवडे म्हणाले, ‘आमदार सुमन पाटील यांच्या प्रयत्नातून आणलेली कामे सत्ताधारी गटाने करावीत.तर खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातून आणलेली कामे आम्ही करत आहोत.कोणतीही कामे झाली तरी ती गावातच होणार आहेत.त्याचा फायदा गावच्या नागरिकांना होणार आहे.राजकारण डोक्यात ठेवून एखादे काम न होण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आहे.सरपंच हा एखाद्या गटाचा नसून तो गावचा असतो.त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. मंजूर होत असलेले काम रद्द करण्यासाठी पत्र देऊन विकास कामाला खोडा घालणे, हे अजिबात बरोबर नाही’.सरपंच नलवडे यांनी दिलेल्या पत्राबाबत उपसरपंच पंकज नलवडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.सत्ताधारी गटाने जर अशीच कट-कारस्थानं यापुढेही सुरू ठेवल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ,असा इशाराही उपसरपंच नलवडे यांनी यावेळी दिला.