महाराष्ट्राला लाभलेल्या संतांचा व दिंडीचा वारसा जपतंय खाडे स्कूल : सीईओ स्वाती खाडे
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी , ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीचा व संतांचा वारसा खूप मोठा आहे. या आषाढी एकादशीचे औचित्य साधत एमटीडीके इंग्लिश स्कूलच्या बालगोपालांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या ज्ञानेश्वरी व अभंग यासारख्या समाजपरिवर्तन केलेल्या ग्रंथांची व पोथींची दिंडी काढली व सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. याविषयी शैक्षणिक संकुलच्या सीईओ स्वाती खाडे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी व ती पुढील पिढीस माहिती मिळण्यासाठी शाळांमधून प्रयत्न होणे गरजेचे आहे असे संगितले. या ग्रंथ दिंडीचे आयोजन यासाठीच करण्यात आले असल्याचेही सांगितले. यावेळी शाळेला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत होते.
या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा आशा अनेक थोर संतांची वेशभूषा तसेच वारकरी वेशभूषा करत अभंग भजन म्हणत शाळेपासून रमा उद्यानातील विठ्ठल मंदिरापर्यंत ग्रंथदिंडी काढली. या दिंडीसाठी शैक्षणिक संकुलच्या सीईओ स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.