महाराष्ट्रच्या संतांची, वारीची व दिंडीची परंपरा जपणारे आदर्शवत एमटीडीके पब्लिक स्कूल… सरपंच (तानंग) सुनील पोतदार
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : मालगाव येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूलने आषाढी एकादशीचे औचित्य साधत तानंग गावातील गावकाऱ्यांसोबत दिंडीचे आयोजन केले. ही दिंडी काढण्यामागे मुलांना आपल्या संत व वारीचा लाभलेला वारसा समजावा व तो अनुभवता यावा हा हेतू असल्याचे शैक्षणिक संकुलाच्या संचालिका सुमन खाडे यांनी सांगितले. खाडे यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली. शाळेने नियोजन केलेल्या या दिंडीमध्ये गावकऱ्यांनी भक्ती भावाने विद्यार्थीरुपी विठ्ठल-रुक्मिणीचे पाय धुत हळदी-कुंकू लावून मनोभावे पूजा करत स्वागत केले. शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन वारीला सुरवात केली. तसेच या दिंडीस वारकरी संप्रदायाचे महादेव राजमाने, अर्जुन पाटील,हर्षवर्धन पाटील,रतन कदम,शिवाजी गुरव,अजित साळुंखे यांचे विषेश सहकार्य लाभले. यावेळी सबंध गावाला विठुरायाच्या पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यावेळी सर्व गावकरी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी दिंडीतील विविध पारंपरिक खेळ खेळले व आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी तानंग गावचे सरपंच सुनिल पोतदार, ग्रामपंचायत सदस्य पूनम साळुंखे, संजय इरळे, रावसाहेब चौगुले, अंकुश राजमाने उपस्थित होते. तर या दिंडीच्या कार्यक्रमासाठी स्कूलच्या सीईओ स्वाती खाडे, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यराक्रमाचे सूत्रसंचालन सुतार यांनी केले. तसेच या दिंडीची सांगता मुलांना प्रसाद देवून करण्यात आली.