मणिपूर घटनेच्या निषेधार्थ तासगावात अंनिस रस्त्यावर; तहसीलदारांना निवेदन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज मणिपूर घटनेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा तासगाव कडून रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यात आला.सिद्धेश्वर चौक येथील निषेध सभेसाठी जेष्ठ विचारवंत लेखक प्रा डॉ बाबुराव गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तें म्हणाले स्वातंत्र्य चळवळीत बहुजन कष्टकरी दलित आदिवासी सर्वांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले आहे आणि त्यातूनच पुढे भारतीय संविधान निर्माण झाले.हे संविधान सर्वांना सन्मानाने जीवन जगण्याची हमी देतें,पण सध्याचे शासनाला संविधान नष्ट करून झुंडी निर्माण करायच्या आहेत.म्हणून मणिपूर सारख्या महिलांना नग्न करून धिंड काढून,सामूहिक बलात्कार करण्याच्या घृणास्पद घटना घडत आहेत,आणि याला केंद्र शासनाची मूक संमती दिसत आहे याचा निषेध आणि कृती सर्व भारतीयांकडून झाली पाहिजे.
अंनिस च्या तालुकाध्यक्ष माजी सभापती छायाताई खरमाटे म्हणाल्या, स्त्री म्हणून आम्हाला लाज वाटते. समाजातील स्त्रिया आणि मुली प्रचंड भीती अश्या घटनेमुळे प्रचंड दडपणाखाली जात आहेत.आम्हाला असला समाज नको आहे,महिला आणि सर्वच थरातील समाजघटकासाठी एक सुरक्षित वातावरण पाहिजे आहे यासाठी पुढे येऊन महिला,मुली आणि संवेदनशील लोकांनी बोलले पाहिजे.अंनिस च्या तालुका उपाध्यक्ष हेमलता बागवडे यांनी मला माझ्या मणिपूर भगिनींसाठी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करता आला परंतु आपण गप्प राहिलो तर हा अधिकार देखील काढून घेतला जाईल का अशी भिती व्यक्त केली.अनेक वक्त्यांनी यावेळी आपली तीव्र भावना व्यक्त करून मणिपूर च्या भगिनींना न्याय मिळाला पाहिजे तसेच मणिपूर आणि इतर राज्यांचा प्रश्न केंद्राने तातडीने लक्ष देऊन सोडवला पाहिजे अशी मागणी केली.सभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
अंनिस सोबत राष्ट सेवा दल आणि तासगाव मधील इतर पुरोगामी संघटना यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.निषेध सभेनंतर तहसीलदार तासगाव यांना मणिपूर घटनेच्या निषेधाबरोबरच जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या घटनेवर प्रशासनाकडून तातडीने कायदेशीर कारवाईची अपेक्षा असलेबाबत निवेदन देण्यात आले.
निषेध सभा आणि निवेदन देण्यासाठी फारूक गवंडी,अमर खोत,बाबुराव जाधव,अविनाश घोडके,डॉ कविता जाधव,संचिता सावंत,नूतन परीट, श्रेया परीट,समीर कोळी,पांडुरंग जाधव,प्रा वासुदेव गुरव,निसार मुल्ला, विशाल खाडे,डॉ मनीषा माळी, हणमंत आण्णा सूर्यवंशी,रोहित शिंदे, स्नेहल गुरव,दत्तात्रय सपकाळ,डॉ सतिश पवार,शशिकांत डांगे उपस्थित होते.