मुंबई अंबोजवाडीतील निष्कासीत झोपडी धारकांना शिंदे सरकारकडून मिळाल का ?
गृहनिर्माण राज्यमंत्री अतुल सावे यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले
प्रतिष्ठा न्यूज/राहुल जैनावर
मुंबई : अतिवृष्टीच्या काळात महाराष्ट्र शासनाने कोणतेही झोपडे न तोडण्याच्या आध्यादेश असताना देखील मालवणीतील अंबोजवाडी, मालाड (प.) येथील दलित, मुस्लिम झोपडपट्टी व शाळा सुध्दा उपजिल्हाधिकारी (अति/ निष्का) मालाड यांनी अमानुषपणे निष्कासीत केली. अतिवृष्टीच्या काळात १ जून / ६ जून/ १९ जुलै २०२३ रोजी सदर झोपडपट्टी तोडली. उपजिल्हाधिकरी यांनी आपल्या बळाचा वापर करुन अमानुषरित्या नागरिकांना बेघर केले इतकेच नाहीतर त्यांच्या दैनंदिन जीवनास आवश्यक साधनसामग्रीची नासधूस केली. सदर अन्यायास न्याय मिळवण्यासाठी रिपाई मालाड तालुका अध्यक्ष श्री. सुनिल गमरे , तालुका सरचिटणीस श्री. शंकर वाकळे, शाखा अध्यक्षा आशाताई खैरनार, श्री. ज्येष्ठ नेते प्रकाश बनसोडे, चारकोप तालुका अध्यक्ष श्री. जगदिशभाई झाल्टे, प्रभाकर निकम यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. अतुल सावे साहेबांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अंबोजवाडीतील नागरिकांना न्याय मिळण्यासाठी निवेदन सादर केले. अन्याय अत्याचार करणाऱ्या शासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन प्रशासकीय कारवाई करणे. अन्याय झालेल्या बेघर झोपडी धारकांचे पुनर्वसन त्वरीत करणे किंवा प्रधानमंत्री अवास योजनेतून त्यांना कायमस्वरूपी घर मिळवून देणे या मागण्याचे निवेदन शिंदे सरकार मधील गृहनिर्माण राज्यंत्री अतुल सावे साहेबांना देण्यात आले. झोपडपट्टीमधील सर्व नागरिकांना गृहनिर्माण राज्यमंत्री अतुल सावे यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले.