बारूळ मानार धरणातील पाणी रब्बी पिकांसाठी सोडावे–माजी सभापती होटाळकर यांची मागणी
प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : रब्बी पिकांसाठी बारूळ मानार धरणातील पाणी कालव्याने सोडावे, अशी मागणी माजी शिक्षण सभापती शिवराज पा. होटाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना नूकतेच एका निवेदनाद्वारे केले आहे.
बारूळ धरणाच्या मन्याड प्रकल्पातून दरवर्षी उजव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर शेतकरी रब्बीचे पीक घेत असतात. परंतु यावर्षी पावसाळा लवकरच संपला. पावसाळा ऋतू संपण्याच्या अखेर पाऊस पडला नाही.
त्यामुळे जमिनीत ओल राहिलेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची केलेली पेरणी वाया गेली आहे. तर अनेक
शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. बारूळ धरणाच्या उजव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर कौठा, शिरूर,चौकी महाकाय, टेंभुर्णी, होटाळा, बेंद्री, तसेच कंडाळा, धानोरा, कुंचेली, शेळगाव, भोपाळा, कामरसपली, टाकळी, आळंदी, बोरगाव, चिटमोगरा, केरुर, आदमपुर, खतगाव अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील विविध रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जाते. त्याच प्रमाणे डाव्या कालव्याचे पाणी सोडल्यास रहाटी,जाकापूर, कौठा, शिरसी,गोणार, येलूर, मसलगा आदी गावातील रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळते. शेतकरी रब्बी हंगामातील गहू,ज्वारी,हरभरा, इत्यादी पिके घेऊ शकतात.
हेच पाणी लवकर सोडले तर रब्बी पिकांची पेरणी वेळेवर होऊ शकते, अन्यथा रब्बी पीक उगवणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे लवकरच मानार धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यात सोडावे, अशी मागणी माजी शिक्षण सभापती शिवराज पा. होटाळकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना केलीआहे.