प्रतिष्ठा न्यूज

भाजपला सत्तेतून हटवल्याशिवाय गोरगरीब कष्टकरी वर्गाला चांगले दिवस येणार नाहीत : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२: केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी जनतेच्या विरोधी सरकार आहे. हे सरकार सत्तेतून घालवल्याशिवाय कामगारांना चांगले दिवस येणार नाहीत. भाजप सरकारने केलेले चार कामगार कायदे हे बडे भांडवलदारांच्या फायद्याचे आहेत. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करुन शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील कामगारांना बेरोजगार करुन देशोधडीला लावण्याचे पाप हे सरकार करत आहे. शेतकरी, कामगार, महिला व शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या या सरकारला एकजूट व मतांतून ताकद दाखवा.. असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगली येथे स्टेशन चौकात भाजपा हटाव.. जनविरोधी सरकार हटाव.. देश बचावचा नारा घेऊन निघालेल्या आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या संघर्ष यात्रेचे स्वागत व पाठिंबा देण्यासाठी आयोजित आशा वर्कर्स व महिला कामगारांच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते शंकरराव पुजारी होते.
पृथ्वीराजबाबा पुढे म्हणाले, ‘ मी कायम आशा वर्कर्स व असंघटित कामगार वर्ग यांच्या हितासाठी काम करत आहे. भाजपा हा थाप मारणारा पक्ष आहे. गोरगरीब लोकांचे शोषण व पिळवणूक करुन श्रीमंत भांडवलदार वर्गाची बाजू घेणाऱ्या या सरकारने आशा वर्कर्सना १५००० रुपये मानधनाचे गाजर दाखवून फसवले आहे. चार कोटी नोकऱ्या देण्याची थाप मारुन बेरोजगारांची फसवणूक केली आहे.
नैसर्गिक आपत्ती,संसर्गजन्य आजारावेळी जनतेच्या प्रत्येक घरात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून औषधोपचार व माहीती घेऊन मदत करणाऱ्या आशा वर्कर्सना किमान वेतनाच्या एक तृतीयांशही नसलेले तोकडे मानधन देऊन त्यांची चेष्टा करणाऱ्या या जनविरोधी सरकारविरोधी सुरु असलेल्या संघर्ष यात्रेस आमचा पूर्ण पाठींबा आहे.
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर ई पेन्शन रु. २०० वरुन रु.१०००केले. पुन्हा सत्तेवर आल्यास ते सहा ते सात हजार करण्याचे ठरविले परंतु काँग्रेस सत्तेत न आल्याने ते झाले नाही. गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने रु. १००० मध्ये कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे अनेकांना देशोधडीला लावले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन आपला प्रश्न लोकसभेत व राज्यसभेत मांडून न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पाठिशी राहून भाजपा हटवा व देश वाचवा त्यासाठी एकजूटीने मताची ताकद दाखवा. ‘
यावेळी गोपाळ पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे, प्रशांत अहिवळे , सुमन पुजारी, जिल्हाध्यक्ष विद्या कांबळे, संगिता बेडगे, अनिता बनसोडे, रेखा परीट, सुवर्णा पाटील, अंजली पाटील हे पदाधिकारी व आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अडीच ते चार कोटी नोकऱ्या देणार आणि आशा वर्कर्सना पंधरा हजार मानधन देणार असे आश्वासन देऊन आजअखेर त्याची पूर्तता केली नाही. ही बेरोजगार व निष्पाप आशा वर्कर्स यांची भाजपा सरकारने फसवणूक केली आहे. याला मतातून उत्तर मिळेल.
– पृथ्वीराज पाटील

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.