द्राक्ष शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे आंदोलन
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: पाऊस व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी मुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे.एकट्या सांगली जिल्ह्यात २० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे.गेले चार-पाच वर्ष सातत्याने निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.याच मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यावर आज आमदार सुमनताई पाटील,रोहित दादा पवार,प्राजक्त दादा तनपुरे व इतर आमदारांसोबत आंदोलन करण्यात आले.यावेळी सलग 3 वर्षे अवकाळीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीसाठी भरीव आर्थिक मदत करावी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी संदर्भात त्यांचे सर्व कर्ज माफ करून एकरी 1 लाख रुपये मदत करावी,द्राक्ष घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायदा बनवावा दरवर्षी कोट्यवधी रुपयांची द्राक्षे घेऊन व्यापारी पळून जातात, द्राक्षबाग उभी करायला एकरी खर्च ३ लाख आहे धुके आले तरी रोग येतो पाणी कमी पडले तरी अडचण होते द्राक्ष पीक खूपच नाजूक पीक आहे,द्राक्ष पिकास पिक विमा लागू करताना 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यानच्या काळातील पिक विमा लागू करावा अगाप छाटणी घेणारे शेतकरी राहून जातो,जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला जातो त्यामध्ये शासनाने शिथिलता द्यावी,
नाशिकला गारपिट झाली म्हणून सरसकट पंचनामे झाले,सांगली भागात फक्त पाऊस पडला म्हणून सरसकट पंचनामे झाले नाहीत ते सरसकट झाले पाहीजेत अशी मागणी सरकार कडे करण्यात आली असून सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी आमदार आमदार सुमनताई पाटील,आमदार रोहित पवार,प्राजक्त तनपुरे आणि इतर आमदारांनी सरकार कडे केली आहे.