विशाळगडावर हजरत पीर मलिक-ए-रेहानच्या नावाने भरणाऱ्या उरुसावर बंदी घाला; विशाळगड मुक्ती आंदोलनाची कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने अभिषेक झालेल्या विशाळगडावर अनेक वर्षे हजरत पीर मलिक रेहान याच्या नावाच्या बेकायदेशीर दर्ग्यात उरुस भरवला जातो. या उरुसामध्ये हजारो कोंबड्या आणि बोकडांचा बळी दिला जातो व मांस शिजवले जाते. त्याचाच नैवेद्य हजरत पीर मलिक-ए-रेहानला दाखवला जातो. या उरुसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांच्या कडून मांसाहार करून, मद्यप्राशन केले जाते. गडावर असलेल्या भाड्याने दिल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खोल्यांमध्ये जुगार व पत्ते खेळले जातात. या सर्व गोष्टींमुळे गडावर आलेल्या लाखो भाविकांच्या मुळे गडाचे पावित्र्य नष्ट केले जाते. या गोष्टींच्या विरोधात राज्य सरकार व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर पशुहत्या बंदी व प्राण्यांचे मांस शिजवण्यावर बंदी व दारू पिण्यास बंदी घातलेली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे विशाळगडावर हजरत मलिक-ए-रेहानच्या नावाने दि.२३, २४, २५ जानेवारी २०२४ रोजी उरुस भरवण्याची शक्यता आहे. ह्या उरुसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासने ताबडतोब बंदी घालून त्या काळात विशाळगडावर पशुहत्या बंदी मास शिजवणे व खाण्यावर बंदी व दारू पिण्यावर बंदी घालावी याची कठोरपणे अंमलबजावणी केली जावी.
मलिक-ए-रेहान हा कोणी सुफीसंत नव्हता तर तो आदिलशाहीच्या काळातील शिर्के व मोरे या मराठा सरदारांच्याकडून मारला गेलेला एक मुस्लीम सरदार होता. त्याच्या थडग्या भोवती वनखात्याच्या व पुरातत्व खात्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम करून त्या थडग्याचे बेकायदेशीर दर्ग्यात रूपांतर केले गेले व त्याचेच पीर म्हणून मोठ्या प्रमाणावर आज उदात्तीकरण झालेले आहे. जसे साताऱ्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफजलखान व सय्यद बंडाच्या थडग्यांभोवती झालेल्या बेकायदेशीर दर्ग्यात उरुस भरवला जात होता व तिथे चालू असलेल्या उरुसावर जशी सातारा जिल्हा प्रशासनाने बंदी घातली व बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त केले. तशीच स्थिती विशाळगडावर आत्ता निर्माण झाली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने जशी बंदी तेथे घातली तशीच विशाळगडावरील ह्या उरुसावर बंदी घालावी अशी मागणी विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदु एकता आंदोलन यांच्यावतीने माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी विष्णुपंत पाटील, गजानन तोडकर, संजय जाधव, दीपक देसाई, परशुराम चोरगे, राजू जाधव, अमित सूर्यवंशी, सोमनाथ गोठखिंडे, विजय टोने, वैभव कवडे, संदीप घाडगे, प्रतीक डिसले, राजू पेंढुरकर, मयूर पाटील, श्रीधर मेस्त्री, ऋषिकेश पाथरे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.