तुरचीचें सरपंच आणि ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार.. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची ग्रामस्थांची तक्रार…
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तुरची ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करताना भ्रष्टाचार केला असून उध्दट वर्तन करुन मनमानी कारभार करण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला आहे.याबाबत सरपंचाकडे तक्रार केल्यास ते ग्रामसेवकांना पाठिशी घालत आहेत.सरपंच-ग्रामसेवकांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी,या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे यांचेकडे देण्यात आले आहे.ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते नारायण उत्तम पोतदार यांनी सदर निवेदन दिले आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,ग्रामसेवक शासन योजनांची माहिती व्यवस्थित देत नाहीत.ते सतत गैरहजर असतात. काही अडचणी सांगितल्या किंवा माहिती विचारली तर उडवाउडवीची उत्तरे देतात,अपमानास्पद वागणूक देतात,अर्ज सुद्धा घेत नाहीत.
ग्रामसभेपूर्वी सात दिवस माहिती देणे आवश्यक असताना एक ते दोन दिवस आधी मागील तारीख टाकून नोटीस लावली जाते.मनमानी कारभार,उद्धटपणा,अपमानास्पद वागणूक देणे,ग्रामस्थांना हीन समजणे याचा प्रचंड त्रास होत आहे.त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून आपण लवकरात लवकर योग्य कारवाई करावी.पोतदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे, ऑनलाईन व ऑफलाईन खरेदी केलेल्या वस्तू अत्यंत निकृष्ट आहेत.इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत जादा दराने खरेदी केली आहे.याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली परंतू त्यांनीही दुर्लक्ष केले.सदर निवेदनावर सतीश पाटील, अक्षय देवकुळे,हरिदास खबाले-कदम संजय ढेबे,दिनकर पाटील,धर्मराज कदम यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.