नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान गारपीट : गहू- केळी व हरभरा सह अनेक पिकांचे मोठे नुकसान
प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यात दि.11फेब्रुवारी 2024 रोज रविवारी दुपारी 5:00 वाजता दरम्यान अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने गहू, केळी, हरभरा, टाळकी ज्वारी सह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी, नायगाव, हिमायतनगर तालुक्यात दि.11फेब्रुवारी रोजी दुपारी5:00 वाजता अचानक तुफान वाऱ्यासह गारपीट होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी, प्रवाशी व रविवारची सुट्टी असल्याने बाजारात गेलेल्या खरेदीदार व व्यापारी यांचे मोठी धांदल उडाल्याने सर्वांनी आपला जीव मुठीत धरूनआजूबाजूच्या ठिकाणाचा आधार घेतला. तर रब्बी हंगामातील गहू, केळी, हरभरा, तूर, टाळकी ज्वारी,भाजीपाला व आंब्याला आलेल्या मोहरांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात उमरी, नायगाव, हिमायतनगर, लोहा तालुक्यात गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास पळवला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमाचे मातीमोल झाले आहे. त्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील पवळे यांनी केली आहे.