श्री शंभूराजांच्या चारित्र्याची इतिहासात चुकीची माहिती.. प्रा अरुण घोडके…तासगाव लक्षवेधी व्याख्यानमालेत आज श्रीमती भागीरथी पाटील यांची प्रकट मुलाखत..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जाणता राजा असलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती श्री शंभूराजे यांनी धर्मासाठी लढण्याचा आणि मरण्याचा मंत्र देऊन त्यांनी आपले आयुष्य त्यासाठी घालविले असताना त्यांच्या चारित्र्याबद्दल चुकीची माहिती दिली जाते.ते धर्मवीर राजे होते,असे विचार प्रा.अरुण घोडके यांनी मांडले.
माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर आबा यांच्या स्मृती दिनानिमित्त रोहितदादा कल्चरल ग्रुपच्या वतीने साने गुरुजी नाट्यगृह येथे लक्षवेधी व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आज प्रा.अरुण घोडके यांनी ‘असे होते शंभूराजे’ या विषयावर गुंफले.यावेळी प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील उपस्थित होते,यावेळी त्यांनी आबांच्या सोबत काम करायला मिळालं असतं तर बरं झालं असतं अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी अरुण घोडके यांनी शंभूचरित्र म्हणजे राष्ट्रजीवनाची पवित्र गाथा आहे.प्रखर देशाभिमानी,बलशाली युवा पिढी बनविण्याची शक्ती केवळ शंभूचरित्रातच आहे.केवळ कुण्या मल्हार चिटणिसाच्या बखरीमुळे शंभूराजाचे जीवनचरित्र बदनाम झाले आहे. शंभूराजे प्रेमवीर नव्हे तर धर्मवीर होते,असे सांगितले.मल्हार चिटणिसाचे खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असताना संभाजी राजांनी दुसर्या कटाच्या वेळी त्यांना हत्तीच्या पायी तुडवून मारले होते. त्याचा राग राजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी म्हणजे इ.स. 1811मध्ये चिटणिसांनी बखर लिहून, त्यांना बदनाम करून काढला, असेही आपल्या व्याख्यानात सांगितले. संभाजीराजे बदफैली नव्हते तर संस्कारशील, शिवनीतीचा अवलंब करणारे शेतकर्यांचे कैवारी, 16व्या वर्षी शेतसारा माफ करणारे, विविध भाषा पारंगत बुद्धिमान राजा होते. त्यांनी बुद्धभूषण,नखाशीख, नायिकाभेद,सातसनक या चार ग्रंथांचे लेखन केले.असा राजा चारित्र्यहीन कसा असू शकतो? त्यांनी पावणेनऊ वर्षांच्या काळात केलेल्या 128 लढायांमध्ये एकही हरले नाही.सर्व जिंकल्या. छत्रपतींच्या तालमीत घडलेले संभाजीराजे दसपट ताकदवान, बुद्धिमान होते. अशा सर्वगुणसंपन्न, सर्वधर्मसमावेशक, धोरणी राजाचा वध औरंगजेबाने तुळापूर वढू बुद्रुक येथे करून या क्रांतिकारी सूर्याचा अस्त केल्याचे आपल्या व्याख्यानात सांगितले. याप्रसंगी त्यांनी शंभूराजाच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला.कार्यक्रमाला राष्ट्रवादीचें पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.