सांगलीत रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. 13 : सुदृढ आरोग्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती शरीरात असणे महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आहारात विविध भाज्यांचा समावेश तितकाच महत्वाचा आहे. तथापि, ऋतुमानानूसार उपलब्ध असणाऱ्या भाज्या शरीरासाठी उपयुक्त आहे. पावसाळयामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. त्या खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्याचा वापर आहारात करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी केले.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सांगली अंतर्गत ऍग्री मॉल (नवीन कोर्टाच्या मागे) विजयनगर,सांगली येथे रानभाजी महोत्सव आयोजीत करण्यात आला होते. रानभाजी महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रकाश सूर्यवंशी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) बाळासाहेब लांडगे, अन्न व औषध विभागाचे डी.एच.कोळी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
रानभाजी महोत्सवामध्ये तांदुळजा, पाथर, गुळवेल, केना, लालमाठ, शेवग्याची पाने, कपाळफोडी, चिगळ, वाघाटे, सराटा, अळू, बांबू, पिंपळ, सुरण, कवठ इ. प्रकारच्या रानभाज्या घेऊन शेतकरी उपस्थित होते. या रानभाजी महोत्सव कार्यक्रमामध्ये मिरज तालुक्यातील सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, सांगली जिल्ह्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,कंप्युटर प्रोग्रॅमर व शेतकरी उपस्थित होते.