म्हैसाळ, ताकारी, टेंभू, पाणी योजना कै. मुंडे साहेबांमुळेच पूर्णत्वास : आमदार सुधीरदादा गाडगीळ
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : “महाराष्ट्र शासनाने लिफ्ट इरिगेशनद्वारे कृष्णा नदीचे पाणी उचलण्याची घोषणा १९७५ सालीच केली होती. पण या योजनेसाठी निधी देण्यात कॉंग्रेस सरकार अपयशी ठरते. १९९५ मध्ये युती सरकार आल्यावर कै. गोपीनाथरावांनी योजनेची माहिती घेतली. काही हजार कोटीच्या या कामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नव्हता. पण मुंडे साहेबांनी हि योजना पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी शासनातर्फे बॉंड विक्रीस काढण्याचे ठरविले. हे बॉंड खरेदी करावेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना आवाहन केले आणि या निधीद्वारे वरील तीनही योजना पूर्णत्वास नेल्या. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा झाल्याने हा भाग सुजलाम सुफलाम झाला, याचे सर्वस्वी श्रेय कै. गोपीनाथरावांचे आहे.” असे विचार आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. कै. मुंडेसाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, प्रकाश तात्या बीरजे, मानसिंग शिंदे म्हैसाळकर, मंडल अध्यक्ष रविंद्र सदामते, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, सुनील भोसले, गणपती साळुंखे, अमोल पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.