गगनबावडा परिसरातील ऊस व भात पिके जाण्याचा धोका अतिवृष्टीचा परिणाम; शेतकऱ्यांच्यावर अस्मानी संकट
प्रतिष्ठा न्यूज तुकाराम पडवळ
गगनबावडा ता. २८ : गेले आठ दिवस गगनबावडा तालुक्यात विक्रमी पाऊस होत आहे.मुसळधार पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. पूर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .कुंभी नदीकाठची ऊस पिके आठ दिवसापेक्षा अधिक काळ पाण्यात राहिल्याने ऊस पिकांची पाने तांबडी पडून तांबेरा ची सुरुवात झाली आहे.तर सुरळीत पाणी गेल्याने ऊस पिके कुजत आहेत., भात पिके सुद्धा पाणी साचून राहिल्याने कुजलेली असून शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेले आहे.दुसरीकडे तग धरून राहिलेली डोंगर भागातील ऊस पिकेही अति पावसामुळे फोल ठरण्याची शक्यता आहे.
* उताराही मिळत नाही *
अति पावसामुळे उसाच्या पानांच्या चिंद्या होतात. वेगाचा वारा, अति गारठा,झडीचा पाऊस यामुळे उसाची वाढ होत नाही. सरासरी उत्पादन घटते व पुढे साखर उताराही मिळत नाही.
* शेतकरी सुटीस अपात्र ठरण्याची शक्यता *
पीक कर्ज उचललेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत पूर्ण फेड केली तरच तो शेतकरी व्याज सूटीस पात्र ठरतो व आकारलेले व्याज सूट मिळते.तसेच परतावा मिळतो. आता ऊस उत्पादनातून हे कर्ज फिटणे अशक्य आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व्याज सुटीस अपात्र ठरण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. यासाठी शासनाने या तालुक्यास’ विशेष बाब’ म्हणून लक्ष द्यावे.अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
“कुंभी नदीकाठची ऊस पिके गेले आठ-दहा दिवस पूर्णतः पाण्यात आहेत. आणखी तीन -चार दिवस पाण्यात राहिल्यास ऊस पिक पूर्णतः वाया जाणार आहे. त्यामुळे घेतलेली कर्जे फेडायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.”
– बाळू जाधव, अध्यक्ष विकास संस्था,सैतवडे,
– विजय वरेकर, मा. सरपंच, सांगशी
– संजय वरेकर,पोलीस पाटील,सैतवडे