गगनबावडा तालुक्यात सात घरांची पडझड, ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर
प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. ३० : तालुक्यात पावसाचा जोर कमी झालेला असला तरी वादळ वारे मात्र चालूच आहे.
*सहा घरे व एका गोठ्यांचे नुकसान*
या दोन दिवसात सहा घरे व एका गोठ्यांचे पत्रे उडून, भिंती कोसळून पडझड झाली. यामध्ये असंडोली येथील दोन घरे, बावेली येथील एक घर व एक गोठा तर खेरिवडे, अंदुर, बालेवाडी येथील एकाचा समावेश आहे.आज अखेर तालुक्यात ४९ घरे व आठ जनावरांच्या गोठ्यांची हानी होऊन अठरा लाखांचे नुकसान होऊन ऐन पावसाळ्यात संकट ओढवले आहे.
तब्बल नऊ दिवस कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील वाहतूक बंद होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कालपासून वाहतुक चालू झाली. पावसाचा जोर ओसरला असला तरी आज अखेर कुंभी मध्यम प्रकल्प क्षेत्रात ३३६६ मि. मी. व कोदे लघु प्रकल्प क्षेत्रात ४१३९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.तर मांडूकली,वेतवडे, शेनवडे बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. पुराच्या पाण्यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बरीच शेती अद्यापही पाण्याखाली गेल्याने चारा काढणे मुश्किल झाले आहे.
*महावितरण सेवा कौतुकास्पद*
गगनबावडा परिसरात तब्बल चार ते पाच दिवस वीज वितरण सेवा कोलमडली होती. प्रचंड वादळ व तुफानी पाऊस त्यामुळे ठिकठिकाणी खांब कोसळले, खांबावर झाडें कोसळली होती. या प्रचंड आव्हानाला प्रसंगी जीव धोक्यात घालून, पुरात पोहूनसुद्धा महावितरणचे अभियंता जाधव व सर्व वीज कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह सुरळीत केला.
*माणुसकीचे दर्शन*
प्रवासात अडकलेल्या प्रवाशांची शेनवडे येथील प्रकाश पाटील, व सांगशी येथील
विशाल पडवळ,अक्षय पडवळ यांनी प्रवाशांची जेवणाची व राहण्याची सोय केली होती.
*ऊस व भात शेती पिकांचे नुकसान*
कुंभी नदीकाठची ऊस पिके गेले आठ-दहा दिवस पूर्णतः पाण्यात आहेत. आणखी तीन -चार दिवस पाण्यात राहिल्यास ऊस पिक पूर्णतः वाया जाणार आहे. त्यामुळे घेतलेली कर्जे फेडायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे.” असे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील, विलास पडवळ, संजय वरेकर यांनी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आदेशानुसार त्वरित पंचनामे केले जावेत. व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. असे सांगितले.