९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीच्या डॉ. तारा भवाळकर यांची निवड ; २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे होणार संमेलन
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत होती. डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
या बैठकीस अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर यावेळी उपस्थित होते. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता होणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नामवंताची मुलाखत होणार आहे.
या संमेलनात खालील विषयावर परिसंवाद होणार आहे.
1) देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य
2) मराठी आणि महाराष्ट्र धर्म
3) लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद
4) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता
5) बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन
6) मराठीचा अमराठी संसार
7) परिचर्चा – “आनंदी गोपाळ” या पुस्तकावर
8) अनुवादावर परिसंवाद
9) मधुरव – हा विशेष कार्यक्रम
दोन कविसंमेलने : 1) बहुभाषिक कविसंमेलन 2) निमंत्रितांचे कविसंमेलन
यापूर्वी सन २००८ मध्ये सांगली येथे झालेल्या ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सांगली येथील ज्येष्ठ साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांनी भूषविले होते. ते अध्यपदाच्या निवडणुकीत विक्रमी मताने निवडले गेले होते.
शोधात, आकलन आणि आस्वाद, महामाया, माझिये जातीच्या, मायवाटेचा मागोवा, लोकपरंपरेतील सीता, सीतायन, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, लोकसंचित, लोकनागर रंगभूमी, मातीची रूपे इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.माझ्या आजवरच्या कार्याचं फलित म्हणून हा सन्मान मिळाला.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्या निवड समितीने माझी निवड केली आहे. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये साहित्य संमेलन हा एक महत्त्वाचा सोहळा असतो. अशा संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर मिळाला. त्याचं निश्चितपणे एक समाधान आहे.”” हा सन्मान हा केवळ माझा नाहीये तर मी ज्या अभ्यासक क्षेत्रामध्ये विशेषतः संस्कृती आणि नात्यांबाबत जे काम करत आले, स्त्रीविचारांबाबत जे काम करत आले अशा सर्वप्रकारच्या साहित्याचा आणि विचारांचा सन्मान आहे. माझ्याआधी काम केलेल्या, माझ्या सोबत काम केलेल्या आणि माझ्या नंतर काम केलेल्या सर्वांचा हा सन्मान आहे असं मी मानते. कारण, लोकसंस्कृतीचा हा जो प्रवास आहे तो माणसाच्या सुरुवातीपासून सलग चाललेला आहे.”
– डॉ. तारा भवाळकर