गौरगांव येथील वंचित क्षेत्रास टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळणार : खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्यास यश
प्रतिष्ठा न्यूज
तासगांव, दि. 27 : तासगांव तालुक्यातील मौजे गौरगांव गावातील पुर्वेकडील जवळपास 500 ते 600 हेक्टर क्षेत्र हे सिंचन योजनांपासून वंचित असून त्या क्षेत्रास पुणदी उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे याकरिता खासदार संजयकाका पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देवून गौरगांव मधील वंचित क्षेत्रास पुणदी उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध करुन देणेकरिता कार्यवाही करणेचे आदेश त्यांचेकडून कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांना देण्यात आले आहेत तसेच लवकरच यासंदर्भातील सर्वेक्षण पुर्ण करुन ही योजना कार्यान्वित करून गौरगांव मधील वंचित लाभक्षेत्रास ओलिताखाली आणणेसाठी कार्यवाही केली जाणार आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार गौरगांव गावातील काही क्षेत्र हे टेंभू उपसा सिंचन योजने अंतर्गत विसापूर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येते. परंतू गावाच्या पुर्वेकडील 500 ते 600 हेक्टर क्षेत्र हे इतर सर्व सिंचन योजनेतून वंचित आहे. मौजे गौरगांवच्या जवळ पुणदी उपसा सिंचन योजनेचा टप्पा क्र. 3 कार्यरत आहे. यातून सिध्देवाडी मध्यम प्रकल्प भरणेसाठी पाईप लाईन टाकलेली आहे. परंतु मागील दोन ते तीन वर्षापासून सिध्देवाडी तलावात टेंभू उपसा सिंचन योजनेच्या भूड येथील टप्प्यातून मोठया प्रमाणात पाणी सोडले जात असूनही या तलावाच्या लाभ क्षेत्रातील शेतकल्यांकडून पुणदी उपसा सिंचन योजनेकडे पाण्याची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे बचत होत असणाऱ्या पाण्यामधून पुणदी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्र. 3 अंतर्गत गौरगांव गावच्या पूर्व भागातील वंचित लाभ क्षेत्रास पाणी देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देवून उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच सर्वेक्षण करून गौरगांव येथील वंचित क्षेत्राला पाणी देणेसंदर्भात कार्यवाही केली जाईल. याबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी सांगलीचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक यांचेसोबत चर्चा करुन लवकरात लवकर सर्वेक्षण पुर्ण करून पुणदी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्र. 3 मधून गौरगांव येथील वंचित क्षेत्राला पाणी मिळावे याबाबत सूचना केल्या. या निर्णयामुळे या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.