तासगावच्या रजिस्टर ऑफिसची नोंदनी महानिरीक्षक यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी लावणार : मनसे नेते अमोल काळे
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:राज्यात तुकडाबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून अनेक मालमत्तांची आणि जागांची अनधिकृत दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार तासगावच्या रजिस्टर ऑफिस मध्ये झाला असून याबाबत लवकरच नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करनार असल्याचे मनसे नेते यांनी सांगितले आहे.या दस्तनोंदणीद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
तुकडाबंदी कायद्यानुसार शेतजमिनींचे हस्तांतर करताना जमिनीचा तुकडा न पाडणे बंधनकारक आहे.प्रत्येक जिल्ह्यासाठी निर्धारित प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या दस्तांची नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय करू नये, अशीही अट आहे. ‘रेरा’मधील तरतुदींनुसार ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावरील बांधकाम किंवा बांधकाम प्रकल्पांमध्ये आठपेक्षा जास्त सदनिका असल्यास संबंधित प्रकल्पांची नोंदणी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) नोंदणी नसलेल्या दस्तांची नोंदणी केली जात नाही.त्यामुळे या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे तासगावच्या रजिस्टर ऑफिस मध्ये दिसून येत आहे.ही दस्तनोंदणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देणार असल्याचे अमोल काळे यांनी म्हंटले आहे.तुकडाबंदी कायदा आणि रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाली असल्यास अशा मालमत्ता अनधिकृत ठरविण्यात येतात.सक्षम प्राधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यासच अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ शकते.त्यासाठी संबंधितांना त्या जागेचा नकाशा मंजूर करून घ्यावा लागतो.त्याशिवाय त्याची खरेदी-विक्री होऊ शकनार नाही.लवकरच याबाबतची सर्व अधिकृत माहिती घेऊन तासगावचे रजिस्टर यांची चौकशी करण्यात यावी यासाठी नोंदणी महानिरीक्षक यांना भेटणार असल्याचे मनसे नेते अमोल काळे यांनी सांगितले आहे.