विश्वकोश निर्मितीमध्ये लेखकांची भूमिका महत्त्वाची- डॉ.राजा दीक्षित
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासात लेखकांची भूमिका महत्त्वाची असते. विशेषतः नवोदित लेखकांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. नवोदित लेखकांमध्ये फार मोठी क्षमता आहे.त्याचा कौशल्याने उपयोग करून घेतला पाहिजे.असे मत महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्व कोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
सांगली येथे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, लेखक आपल्या भेटीला आले याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे लिखाणाला एक नवी ऊर्जा मिळते. अनेकांना लिहते व बोलते करणे हेच खरे ज्येष्ठ लेखकाचे काम असते.
‘गप्पा साहित्यिकांशी’ या सदरात बोलताना डॉ.राजा दीक्षित म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात भाषा आणि संस्कृती विकसित करण्यासाठी अद्यावत ज्ञान आत्मसात करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यादृष्टीनेच मराठी विश्व कोश निर्मितीचे मंडळाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. खरे तर लेखक आणि वाचक यामध्ये खऱ्या अर्थाने दुवा साधण्याचे काम ग्रंथ करीत असतात.त्यामुळे कसदार आणि दर्जेदार साहित्य निर्मितीची जबाबदारी लेखकांची असते.मराठी भाषेच्या विकासासाठी नवोदित लेखकांनी स्वतःला कमी न लेखता साहित्य क्षेत्राची सेवा करावी. साहित्याला आणि साहित्यिकाला जात आणि धर्म नसतो आणि लेखकांना तर नसतोच नसतो. इथून पुढचा काळ विचारात घेता मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन,लेखक आणि प्रकाशक यांनी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे.
अनौपचारिक गप्पांमध्ये कवी आणि लेखक विठ्ठल मोहिते, ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुवर्णा ठिगळे, इ. मान्यवर सहभागी झाले.