राज्यातील कंत्राटी पध्दतीने होणारी नौकर पदभरती रद्द करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : राज्यात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयातील नौकर पदभरती बाबतचा शासन निर्णय क्रमांक काआआ- 2017- प्र. क्र. 233- कामगार- 8 मागे घेण्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेडचे उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व अग्रेसर राज्य म्हणून प्रसिद्ध आहे परंतु गेले काही दिवस आपण महाराष्ट्राच्या नावारूपास काळीमा फासणारे अनेक निर्णय घेत आहात. त्यातीलच एक निर्णय म्हणजे आपण दि.14 मार्च 2023 रोजी काढलेला सेवा पुरवठादार संस्थांची निवड करणारा शासन निर्णय क्रमांक काआआ- 2017- प्र. क्र. 233- कामगार- 8 हा होय.
आपणास जाणीव आहेच गेली अनेक वर्ष प्रशासनातील विविध विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगारीचा प्रचंड मोठा उद्रेक महाराष्ट्रामध्ये आधीच उसळलेला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मेगाभरतीच्या नावाखाली गाजर दाखवण्याचा प्रकार होत असताना दुसरीकडे आपण अशा पद्धतीचे शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांची एक प्रकारे थट्टाच करत आहात.
अस्मानी आणि शासकीय संकटाला सामोरे जाणारा शेतकरी बाप आधीच अडचणीत असताना दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हक्काच्या रोजगाराच्या संधी देखील आपण वरील निर्णयाच्यामुळे काढून घेत आहात. आपण काढलेला जीआर म्हणजे महाराष्ट्रातील शासकीय नोकऱ्या संपवण्याची नांदीच आहे असे आम्हास वाटते. या आपल्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता पसरली असून शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण होत आहे. कदाचित ही नाराजी रस्त्यावर आल्यास महाराष्ट्रात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईच्या जनभावना लक्षात घेऊन आपण दि.14 मार्च 2023 रोजी काढलेला कंत्राटी पद्धतीवरच्या नोकर पदभरतीचा निर्णय शासन निर्णय तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील विविध विभागात रिक्त असलेली पदे एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा बेरोजगारांची एक मोठी फौज रस्त्यावर उतरेल व त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न यासाठी आपण व आपले शासन जबाबदार राहील असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे, जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील, सतीश धुमाळ, अविनाश शिंदे, बालाजी देशमुख, कमलेश कदम, मारोती मेंडेवाड, प्रेमानंद खिलारे, परमेश्वर खोसे आदिंची यावेळी उपस्थिती होती