“मोदी @9” अभियान प्रभावीपणे राबविणार : जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील
प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : जत भारतीय जनता पार्टीने जर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन व जनसंपर्क मोहिमेवर अधिक भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जत विधानसभा मतदारसंघ 288 या मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी आपणावर सोपविले आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
रवीपाटील म्हणाले की,
भाजपचे महाराष्ट्राचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपणावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला पात्र राहून आगामी काळात मजबूत पक्ष संघटन करण्यात येणार आहे.
जत विधानसभा मतदार संघातून भाजपचे तीन वेळा आमदार झाले आहेत. भाजप हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचला आहे. तालुक्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत मजबूत फळी आहे. पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पक्षाने एक प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी ‘मोदी @9 ‘ हे अभियान राज्यभर सुरू आहे.
पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षात देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने जे पाऊल उचलले आहे, त्याची प्रत्येक मतदार व नागरिकापर्यंत माहिती पोहोचविणे हा यामागील उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील व देशातील अनेक मंत्री, आमदार, खासदार व दिग्गज नेते जत तालुक्यात विविध उपक्रमांसाठी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांना तालुक्यात आणण्याचा मानस आहे.
रवीपाटील यांनी सांगितले की, भाजपचे अध्ययवत कार्यालय जनसंपर्क
येत्या पंधरा दिवसात जतमध्ये सुरू करण्यात येणार आहे. हे कार्यालय सामान्य नागरिकांपासून प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत सर्व घटकांची जोडले जाणार आहे. कार्यालयात अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त अशी “वार रूम” निर्माण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ या कार्यालयातून जनतेशी संपर्क साधणार आहेत.
पक्ष वाढी सोबतच तालुक्याचा विकासाचा अजेंडा प्राधान्याने राबविला जाणार आहे. मागील महाविकास आघाडीच्या काळात जत तालुका विकासापासून संपूर्णपणे वंचित राहिला आहे. रस्ते, गटारी, सभामंडप, मुरमीकरण, खडीकरण व सिमेंट रस्ते म्हणजेच विकास असा प्रपोगंडा लोकप्रतिनिधी कडून केला जात आहे. मात्र विकासाची नेमकी व्याख्या सोयीने विसरली जात आहे. जत तालुक्यात रोजगार निर्मिती शुन्य पातळीवर आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. बेकारी वाढली आहे. तालुक्याचा कोणताही औद्योगिक विकास झाला नाही. उच्च शैक्षणिक संस्थांचा जत तालुक्यात नेहमीच दुष्काळ आहे. कोणताही विकासात्मक प्रकल्प जत तालुक्यात राबविण्यात आला नाही. दुसऱ्या तालुक्याच्या तुलनेमध्ये जत तालुका 25 ते 30 वर्षे पाठीमागे राहिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून दोन हजार कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जत पूर्व भागाचे नंदनवन होणार आहे.
भविष्यात जत तालुका विकासाच्या वाटेवर पोहोचायचा असेल तर भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो आहोत.
पक्ष व संघटनात्मक पातळीवर पक्षाने निवडणूक प्रमुख म्हणून फार मोठी जबाबदारी सोपविले आहे. जनता व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पक्षाने ही जबाबदारी दिली आहे. जत तालुक्यातील जनतेला या पदाच्या माध्यमातून न्याय देणे हीच आपली भूमिका राहणार आहे, असेही रवीपाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जत शहर अध्यक्ष अण्णा भिसे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष पिरगोंडा कोळी,युवा नेते कामन्ना बंडगर,नरेंद्र कोळी,राहुल बनसोडे,उत्तम दिवेकर उपस्थित होते.