तासगावात पदभार घेताच डीवायएसपी, पीआय रस्त्यावर… पेट्रोलिंग करून टवाळखोरांना इशारा…
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावात पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.पदभार स्वीकारताच दोघांनी आपल्या पोलीस फौज फाट्यासह शनिवारी रात्री शहरातून सायरन वाजवत पेट्रोलिंग केले.शहरातील प्रमुख मार्गावर रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमणे हटवली.शिवाय रात्रीच्या वेळी रस्त्याच्याकडेला अनावश्यक थांबणाऱ्या टवाळखोरांना हटकून कारवाईचा इशारा दिला.पोलिसांच्या या कृतीचे शहरवासीयांकडून स्वागत होत आहे.
तासगाव नगरपालिकेने वाहतूक नियोजनासाठी शहरातील प्रमुख रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले आहेत.या पट्ट्यांमध्ये सम – विषम तारखेला वाहने पार्किंगची मुभा देण्यात आली आहे.मात्र अनेकजण या नियमावलीचे पालन करीत नाहीत. तर वाहनचालकांनी एका बाजूला पट्ट्याच्या आत वाहने लावली तर दुसऱ्या बाजूला हातगाडी,चायनीज सेंटर व केळी विक्रेते,दुकानदारांचे बोर्ड रस्त्यावर ठेऊन अतिक्रमण केलेले दिसत आहे.परिणामी वाहतूक कोंडी व्हायची तशी होतेच.त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा करून मारलेल्या या पट्ट्यांचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित होत होता. त्यातच चायनीज सेंटरसह अन्य हातगाड्यांवर टवाळखोर युवक गर्दी करून थांबत होते.त्यांच्या उपद्रवामुळे महिला विद्यार्थिनी व अबालवृद्धांना त्रास होतो.याबाबत पोलिसांकडे अनेकवेळा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी पोलीस फौजफाटा घेऊन शनिवारी रात्री शहरातील प्रमुख मार्गावरून पेट्रोलिंग केले.टवाळखोरांना गर्भित इशारा दिला.शिवाय प्रमुख रस्त्याच्या कडेला छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे हटवली.पुन्हा अतिक्रमणे केल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाली. पोलीस गाड्यांचा सायरन वाजवत केलेल्या पेट्रोलिंगमुळे शहरात जोरदार चर्चा होती.तासगाव शहरातील रस्त्याकडेला हातगाडी,चायनीज सेंटर, केळी विक्रेते व छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांनी स्टॉल मांडत अतिक्रमणे केली आहेत.रस्त्याच्या एका बाजूला वाहन पार्किंग आणि दुसऱ्या बाजूच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत होती.पोलीस निरीक्षक वाघ व पोलीस उपअधीक्षक थोरबोले यांनी शनिवारी रात्री पेट्रोलिंग करीत ही अतिक्रमणे हटवली.मात्र ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे ही कारवाई नको, त्यामध्ये सातत्य हवे,अशी अपेक्षा तासगावकरांनी व्यक्त केली आहे.