स्वार्थाने पिसाळल्याने तोंडाला येईल ते बोलणाऱ्यांच्या नादी लागू नका पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या भाजपला साथ द्या : संजयकाका पाटील; जत तालुक्यात प्रचार दौरा
प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : स्वार्थाने पिसाळलेली काही माणसं तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेत. त्यांच्या नादी लागू नका. जत तालुक्याच्या विकासाकरता भाजपला साथ द्या, असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्याच्या प्रचार दौऱ्या दरम्यान वळसंग येथे ते बोलत होते.
जत तालुक्यातील वळसंग व्हसपेठ, आसंगी यासह विविध गावांचा दौरा संजयकाका पाटील यांनी केला.
संजयकाका म्हणाले, काही माणसं स्वार्थाने पिसाळल्यासारखी वागत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांच्या नादी लागू नका. म्हैसाळ योजनेसाठी मी काय केलं असं जर ते विचारत असतील तर त्यांनी समोर यावं म्हैसाळ योजनेसाठी आम्ही काय केलं हे त्यांना आम्ही दाखवून देतो. राजकीय स्वार्थासाठी कोणीही टीका करते परंतु एवढी वर्षे जत तालुक्याला दुष्काळाच्या खाईत कोणी ठेवलं. कोणत्या कारखान्याला जत ची माणसं ऊस तोडी म्हणून पाहिजे होती. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. ज्यांनी स्वार्थासाठी संस्था बंद पाडल्या हजारो माणसं देशोधडीला लावली. ते इथं येऊन आमच्यावर टिका करत आहेत.
जत चा पाण्याचा प्रश्न शंभर टक्के भाजपा महायुती सोडवणार आहे. राजकीय श्रेयवादात न अडकता आपण जतच्या सर्व भागात पाणी कसं जाईल याचा विचार करूया . म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी 2100 कोटी मंजूर झाले आहेत .येणाऱ्या दीड वर्षात ही विस्तारित योजना पूर्ण होणार आहे. त्यामुळे पाण्यापासून वंचित असणाऱ्या सर्व गावांना पाणी मिळणार आहे. आता कायमचा दुष्काळ हटवायचा असेल तर महायुती हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आपण या निवडणुकीत मला साथ द्यावी. मताधिक्य देऊन विजयी करावे. जे कोणी स्वार्थासाठी राजकारण करत आहेत त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे इथे येऊन आमच्या विरोधात कोण काय बोलतो यापेक्षा आम्ही केलेल्या विकास कामांचा विचार करा. असे आवाहन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.