ऊसतोड मजुरांचे स्थलांतर झाल्याने अनेक पाल्य शिक्षणा पासुन वंचित- साखर शाळा, हंगामी वस्तीगृह सुरू करण्याची: मजुर पालकांची मागणी
प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील अनेक गाव व तांड्यातील ऊसतोड मजूरांने आपल्या शिक्षण घेत असलेल्या शाळकरी मुलामुलींचे उसतोडणीसाठी स्थलांतर झाल्याने शाळेत पटसंख्या कमी जाणवत असल्याचे विदारक चित्र दिसत असुन शासनाने सुरू केलेली साखर शाळा कुठेही चालु असल्याचे दिसत नाही.
त्यातच उमरा व पाच तांडयातून ऊसतोड मजुरांचे आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी शाळकरी मुलांसह स्थलांतर झाल्याने दिपावली सुट्टीनंतर दुसऱ्या सत्रातील शाळेतील हजेरी पटावर उपस्थिती पटसंख्या वर परिणाम दिसुन येत असल्याचे हे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनस्तरावरून सुरू करण्यात आलेली साखर शाळा सर्वत्र चालु करण्याची गरज असल्याचे मजुर पालकांचे म्हणणे आहे.
तसा लोहा तालुका हा डोंगराळ असून येथील शेती कोरडवाहू आहे. शेती सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती असल्यामुळे शेतातील पिके काढणीनंतर शेतमजूर व कामगार आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होत असतात.सध्या अनेक गावातील व तांड्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील विध्यार्थी गैरहजर असल्याचे दिसत आहे.
स्थलांतरित होणाऱ्या मजुर पालकांच्या मुलांसाठी साखर शाळा, अनिवासी हंगामी वस्तीगृह योजना असली तरी प्रशासन ही योजना राबविण्यासाठी अनुत्सुक असल्याची चर्चा ऐकायला येत असून शासनाने स्थलांतरित होणाऱ्या प्रत्येक पालकाच्या पाल्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र योजना राबविणे गरजेचे आहे.
बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे गरजेचे असले, तरी विद्यार्थ्यांची नावे शाळेत शाळेत दाखल असून देखील कुटुंब स्थलांतरामुळे अनेक मुले शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.