भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा; विजेत्या ग्रामपंचायतींना लाखोंची बक्षिसे राज्यस्तरावर १ कोटी तर जिल्हास्तरावर ५० लाखांचे प्रथम पारितोषिक : २५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अटल भूजल योजनेंतर्गत गावा- गावांमध्ये विधायक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन हे ब्रीद साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले आहे. या गावांमध्ये चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्याचे काम वनराई संस्था पुणे यांच्या मार्फत केले जात आहे. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन निधी, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून, २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षांसाठी ही स्पर्धा राबविण्यात येत असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने दिली.
राज्यामध्ये भूजल उपशाचे प्रमाण अधिक असून, यामध्ये प्रामुख्याने नगदी पिकांच्या सिंचनाकरिता भूजलाचा उपसा अधिक होत आहे. त्यामुळे अशा क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित या वर्गवारीमध्ये समाविष्ट आहेत.
पुनर्भरणापेक्षा अधिक भूजल उपसा विंधन विहिरीद्वारे केल्याने भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी केंद्र शासन व
जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत
असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
• जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस ५० लाख रुपये, द्वितीय बक्षीस ३० लाख रुपये आणि तृतीय बक्षीस २० लाख रुपये राहील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांची निवड निकषानुसार तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय निवड समितीमार्फत गावांचे मूल्यांकन करून होईल.
• अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत ठराव करून ठरावाच्या प्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली यांच्याकडे २५ एप्रिलपर्यंत सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.