40 वर्षे हातनूरकरांची तहान भागवणाऱ्या जलकुंभाचे निर्लेखन
प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी :1983 साली महाराष्ट्राचे तत्कालीन नवनियुक्त मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या, तत्कालीन मंत्री शालिनीताई वसंतराव दादा पाटील यांच्या हस्ते पायाभरणी झालेला दीड लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ अखेर निर्लेखित करण्यात आला.
हातनूर हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमीच प्रगल्भ म्हणून ओळखले जाते, हातनूरच्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून 1983 साली हा जलकुंभ बांधण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला वसंतदादा कार्यक्रमांचे व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नव्हते, तथापि तत्कालीन मंत्री शालिनीताई पाटील व आमदार दिनकर आबा पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जलकुंभाच्या पायाभरणीसाठी होनाईच्या कुशीत हातनूरच्या मातीत पहिल्यांदाच उतरलेले काचेचे लाल-काळ्या पट्ट्यांचे हेलिकॉप्टर, लँडिंगनंतर राजेंद्र कोळी यांचे घराजवळ, यशवंत टुरींग टॉकीज नजिक झालेली छोटेखानी सभा हातनूरच्या आबालवृद्धांच्या चाळीस वर्षे काळजात जपून ठेवलेला ठेवा होते.
तत्कालीन नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा व कुपनलिका तंत्रज्ञानाने गाव वेशीखालील आडाजवळील नवीन घेतलेल्या कुपनलिकेतून हातनूरला पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर हातनूर गाव हे सिद्धेवाडी तलावातील पेड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला जोडले होते.
सध्या मात्र या पाण्याच्या टाकीला दोन ते तीन पर्यायी टाक्या उपलब्ध करून विसापूर- पुणदी उपसा जलसिंचन योजनेला संलग्न हातनुरच्या ईशान्य भागातील तळ्याखालील विहिरीतून हातनूर ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. जीर्ण झालेल्या या जलकुंभाचे निर्लेखन चेनच्या जेसीबी बुलडोझरने नुकतेच करण्यात आले. प्रत्येकाला आपल्या गावचा, कुटुंबाचा घटक वाटणाऱ्या जलकुंभाचा विरह हातनूर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.