योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही : मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरूपोर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरूला देवतुल्य मानले, त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात.
मालगाव येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत गुरुविषयी गुलाबपुष्प देऊन मुलांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणल्या की, “योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही”. तसेच महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण, महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई – वडील पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सर्व शिक्षकांना आपल्या भावना गुलाबपुष्प व भेटकार्ड देऊन व्यक्त केल्या. आराध्या काळे या विद्यार्थीने आपल्या नृत्य कलेतून शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कूलचे विद्यार्थी, शिक्षवृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.