आस्था बेघर महिला निवारा केंद्रात नवविवाहितांचे पहिले माहेरपण ; सौ. विजया पृथ्वीराज पाटील यांचा अनोखा उपक्रम
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि.१० : मिरजेतील आस्था बेघर महिला निवारा केंद्रात आज पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजया पृथ्वीराज पाटील यांनी तेथील नवविवाहितांची ओटी भरुन साडी चोळीचे वाण देऊन वंचित बेघर महिलांचे लग्नानंतरचे पहिले माहेरपण केले. शाहीन व सुरेखा शेख या अवलिया दांपत्यानी दिव्यांग, मनोरुग्ण, अत्याचारित व वंचित महिलांचे आईवडील बनून महापालिकेच्या या निवारा केंद्रात निराधार बेघर महिलांना सन्मानाचे घर उपलब्ध करून दिले आहे. अशा महिलांच्या लग्नानंतरचे पहिले माहेरपण करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता असे उद्गार विजया पाटील यांनी काढले.
यावेळी शाहीन शेख म्हणाले, ‘गेल्या २५ वर्षातील हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पारखे झालेल्या बेघर महिलांचा माहेरपणाचा कार्यक्रम पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली विजया पाटील यांनी केला. हा उपक्रम म्हणजे त्यांनी केलेली दुःखमुक्तीची लढाई आहे.पृथ्वीराज पाटील हे कायमच गोरगरीब व वंचितांना मदत करणारे संवेदनशील व दयाळू लोकप्रतिनिधी आहेत. एक आगळावेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण असा हा उपक्रम बेघर महिलांच्या जीवनात आईच्या वात्सल्याची अनुभूती देणारा आहे.
सुरेखा शेख म्हणाल्या, ‘ या निवारा केंद्रातील बेघर महिलांची लग्नं आम्ही केली आणि पृथ्वीराज व विजया पाटील यांनी त्यांना सक्रांतीचे वाण देऊन त्यांचे माहेरपण केले.बेघर महिलांना विजया पाटील म्हणजे वात्सल्यसिंधू आईच आहे असे वाटले. यावेळी विजया पाटील यांनी शाहीन व सुरेखा शेख यांचा सत्कार करुन अशा बेघर महिला निवारा केंद्रासाठी शासनाने मदत उपलब्ध करून देण्यासाठी हात आखडता घेऊ नये. समाजातील दान देण्याची इच्छा असलेल्या लोकांनी या बेघर निवारा केंद्राला द्यावे असे आवाहन केले.
यावेळी सविता शरद ठोकळे, सविता राजेश चौधरी, कसबे डिग्रज येथील सहजीवन संस्थेचे अध्यक्ष महमद खाटीक, सचिव स्नेहा सुतार, प्रा. एन.डी.बिरनाळे, दिलीप पवार उपस्थित होते.