जनतेचा विकास हाच भाजपचा अजेंडा असून राजकारणाचा धंदा करणाऱ्यांना कोणीही भुलणार नाही : संजयकाका पाटील; मिरजेतील नगरसेवक व जनताआमच्या बरोबर; प्रचार दौरा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जनतेचा विकास हाच भाजपचा अजेंडा असून राजकारणाचा धंदा करणाऱ्यांना कोणीही भुलणार नाही. मिरजेतले नगरसेवक आणि जनता आमच्याबरोबर आहे. असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले. मिरजेत प्रचार दौऱ्यादरम्यान बैठकीत बोलत होते.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांनी मिरज शहरात आज दिवसभर दौरा केला यादरम्यान विविध ठिकाणी भेटीगाठी आणि बैठका घेतल्या. शेतकरी चौक, मिरज प्रभाग क्र. 7 येथून प्रचार शुभारंभ करण्यात आला. ब्राम्हणपूरी, पटवर्धन वाडा, बसवेश्वर चौक, बुधवार पेठ, मेंढे मळा, भानू तालीम जवळ, कबाडे वाडा, धनगर गल्ली, डोणगे गल्ली, समतानगर, पंढरपूर रोड, रेणुका मंदिर भेट, शास्त्री चौक असा प्रचार दौरा करण्यात आला.
पालकमंत्री सुरेश खाडे ज्येष्ठ नेते दीपक भाऊ शिंदे म्हैसाळकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, संजय चौगुले, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, युवा नेते सुशांत खाडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.
संजयकाका म्हणाले, मिरजेतील काही लोकांनी राजकारणाचा धंदा मांडला असून अशा बाजार बुणग्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल. पक्षाने ज्यांना दोन वेळा स्थायी समितीचे सभापती पद दिले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. ते ज्या जातीत जन्मले त्या जातीच्या तत्त्वांनाही त्यांनी तिलांजली दिली आहे . अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करून भारतीय जनता पार्टीच्या विकास कामांकडे आपण लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. त्याचा विचार करून लोकसभा निवडणुकीत मिरजकरांनी भाजपाला मताधिक्य द्यावे. असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.