संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू सुहासभैया बाबर, तानाजीराव पाटील यांची आटपाडीतील मेळाव्यात ग्वाही
प्रतिष्ठा न्यूज
आटपाडी, दि.२७ : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठीशी खानापूर- आटपाडी मतदारसंघातील सर्व जनता ताकद एकवटून उभी राहील. संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी जीवाचे रान करेल अशी ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभैया बाबर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तानाजीराव पाटील यांनी आज येथे दिली. भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांनी सुहासभैया बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी केलेल्या आवाहनाला जोरदार उस्फुर्त प्रतिसाद दिला.
सुहासभैया बाबर म्हणाले, माजी आमदार (कै.) अनिलभाऊ बाबर यांनी संजय काका पाटील यांच्याबरोबर खानापूर- आटपाडी मतदार संघातील पाणी प्रश्नासाठी अथक प्रयत्न केले. शेत शिवारात पाणी पोहोचवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे अनिलभाऊंनी संजयकाका पाटील यांच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील विजयाच्या हॅट्रिक्ससाठी शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तो शब्द आपण पूर्ण करायचा आहे. या निवडणुकीत सर्वांनी पूर्ण ताकतीने संजयकाका पाटील यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. त्यामध्ये आतबाहेर, इकडे तिकडे काहीही चालणार नाही.
तानाजीराव पाटील म्हणाले माजी आमदार ,(कै.) अनिलभाऊ बाबर यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा घेऊन सुहासभैया बाबर काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी आपण सगळी ताकद उभी करायची आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याची आपली जबाबदारी आहे. त्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने कोणताही दुजाभाव न ठेवता ताकतीने प्रयत्न करायचा आहे. काम करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत संजयकाका पाटील यांना खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देऊन लोकसभेत तिसऱ्या खेपेस आपल्याला विजयी करून पाठवायचे आहे अशी खूणगाठ प्रत्येक कार्यकर्त्याने बांधली पाहिजे.
या मेळाव्यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त केले आणि संजयकाका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.