महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या ४५ जागा जिंकणार; देशभर मोदी नावाची त्सुनामी : केशव प्रसाद मौर्य यांनी पत्रकार परिषदेत केला विश्वास व्यक्त; 2024 ची निवडणूक देशाला महासत्ता बनविणार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 2014 नंतर देशाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला. आज जगातल्या प्रमुख देशांमध्ये भारताची गिनती होत आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशाला महासत्ता बनविणार आहे. तर महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या ४५ जागा जिंकणार आहे, असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘मोदी @9’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मौर्य सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केशव प्रसाद मौर्य म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली जगभरात भारत देशाचा डंका वाजतो आहे. आपण सर्वांनी बघितलं की रशिया आणि युक्रेंच्या युद्धाच्या दरम्यान केवळ मोदींच्या सांगण्यावरून दोन्ही देशांनी युद्धबंदी केली. ज्यामुळे हातात तिरंगा घेऊन सर्व भारतीय सुखरूप पणे देशात परत आले. हा मोदी नावाचा चमत्कार आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. गरिबांना पक्के घरे देण्यात आले आहेत. प्रत्येकाला पाणी मिळावे, यासाठी देशभरात जल जीवन मिशन या योजनेद्वारे पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे. हा केवळ विकासाचा ट्रेलर आहे. यानंतर पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर विकासाचा खरा पिक्चर आपणा सर्वांना पाहायला मिळेल, असे केशव प्रसाद मौर्य म्हणाले.
ते म्हणाले, मी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. या देशाचा नागरिक आहे. नंतर मी मंत्री, उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे आपल्यातून फिरताना वावरताना मी लोकांची मते जाणून घेत असतो. मी दोन दिवस महाराष्ट्रमध्ये आहे. या काळात मला मोदी सरकार आणि स्वतः नरेंद्र मोदी यांच्या बद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून आले. देशभर प्रमाणे महाराष्ट्रातही मोदी लाट येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत निश्चितपणे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2014 पर्यंत या देशामध्ये निराशेचे वातावरण होते. देशातल्याच नव्हे, तर शेजारील राष्ट्रांच्या समस्यांबाबतही आपणाला अमेरिका, युरोप, चीनकडे पाहावे लागत होते. मात्र आपण मोदी सरकारच्या काळात आत्मनिर्भर झालो आहोत. यापूर्वी देशावरती अतिरेकी दहशतवादी हल्ले झाले तर आपण केवळ निषेध करत होतो. पण, 56 इंच छातीचा नेता असणाऱ्या काळात आपण सर्जिकल स्ट्राइक करून या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, ‘सत्यमेव जयते’ या उक्तीवर आमचा विश्वास आहे. यापुढील काळातील देशातील कष्टकरी शेतकरी श्रमिक गरिबांचा विकास केवळ मोदीच करू शकतात, असे मौर्य म्हणाले.
*जे स्वतः च्या राज्यात सत्ता आणू शकत नाहीत ते मोदी हटविण्याची भाषा करतात*
25 जून रोजी बिहारमध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. केवळ मोदी हटाओ या एकाच मुद्द्यावर यांचे एकमत आहे. संपूर्ण जगाने मोदींचे नेतृत्व मान्य केलेले असताना, देशातल्या विरोधी पक्षांना केवळ मोदी द्वेशाने पछाडले आहे. देशाच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम विरोधी पक्षाकडे नाही. जर काँग्रेस परत सत्तेत आली तर 370 कलम परत लागू केले जाईल. मात्र पुढील शंभर वर्ष देशात कमळ फुलेल, असा विश्वास यावेळी मौर्य यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींवर घणाघाती टीका
यावेळी राहुल गांधी यांच्यावर केशव प्रसाद मौर्य यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले रामाला कल्पनिक म्हणणारे आता स्वतःला जाणवेधारी ब्राह्मण म्हणत आहेत. केवळ इफ्तार पार्ट्यामध्ये रमणारे देशातल्या मंदिरांसमोर नतमस्तक होत आहेत. ही मोदी नावाची जादू आहे. राहुल गांधी जगात फिरत असताना इंग्लंड अमेरिकेमध्ये जाऊन मोदींच्या वर टीका करतात. देशाची बदनामी करतात. हाच त्यांचा खरा अजेंडा आहे.