मराठा समाजाच्या हितासाठी संजयकाकांना साथ देणार : दिलीप जगताप; सांगलीत मराठा महासंघ पदाधिकारी मेळावा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठा समाजाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना आम्ही साथ देणार असून प्रचंड मताधिक्याने दिल्लीला पाठविणार आहोत, अशी घोषणा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी केली.
सांगली येथील द ग्रेट मराठा हॉटेल येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिलीपदादा जगताप बोलत होते.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, शरद नलवडे , मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवरे, राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप धन्द्रे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव गनगोडे, मुंबई संपर्कप्रमुख अनिकेत मोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विलास देसाई, सांगली जिल्हा अध्यक्ष अमरसिंह पाटील, सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, सांगली महापालिका क्षेत्राध्यक्ष विजय धुमाळ, मिरज तालुका अध्यक्ष नंदू शिंदे, पलूस तालुकाध्यक्ष सुरज भोसले, सुजाता पाटील, राणी चव्हाण, नेताताई देसाई यांच्यासह संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. पूजा जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विलास देसाई, दीपकबाबा शिंदे मिसाळकर यांची भाषणे झाली. प्रदीप कोडग यांनी आभार मानले.
दिलीप जगताप म्हणाले, मराठा महासंघाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली. ती भाजपा युतीच्या काळात पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा महायुतीमुळेच मार्गी लागणार आहे. त्यामुळे समाजाच्या हितासाठी आम्ही भाजपा महायुती बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला दिलेला पाठिंबा हा सशर्त पाठिंबा आहे. समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवा आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण द्या. ही आमची मागणी आहे. सगळ्याच लढाया रस्त्यावरती होत नाहीत काही वेळा बसून मार्ग काढावा लागतो. आरक्षणाचा मार्ग असाच निघू शकतो. म्हणून हा पाठिंबा आहे. आरक्षण हे केंद्र सरकार देऊ शकते आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर मराठा महासंघाचे दोन संचालक असावेत. जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांसाठी मराठा वसतीगृहे व्हावीत. जिल्हा पातळीवर मराठा समाज भवन व्हावे. अशा अनेक समाज हिताच्या मागण्या आपण केलेल्या आहेत. त्या निश्चितपणे महायुती मार्फत पूर्ण होतील. अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि म्हणूनच आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजयकाका पाटील यांना मताधिक्य देऊन दिल्लीला पाठवणार आहोत. संपूर्ण मराठा समाजाने संजयकाकांच्या पाठीशी राहावे. असे आवाहन दिलीप जगताप यांनी केले.