पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी मला मते द्या : संजयकाका पाटील; अंकलखोप येथे बैठक
प्रतिष्ठा न्यूज
भिलवडी प्रतिनिधी : देशाच्या विकासासाठी पुन्हा मोदींना निवडून देण्यासाठी मला मते द्या असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अंकल कप येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
खासदार संजयकाका पाटील यांनी आज पलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद आणि अंकलखोप जिल्हा परिषद गटातील गावांच्या बैठका घेतल्या. नृसिंह मंदिर खटाव येथे भिलवडी जिल्हापरिषद गटातील वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, भिलवडी, माळवाडी, हजारवाडी, भिलवडी स्टेशन या गावांची बैठक झाली.
गौरी गार्डन, अंकलखोप येथे अंकलखोप जिल्हापरिषद गटातील अंकलखोप, नागठाणे, सूर्यगाव, संतगाव, धनगाव, अमणापुर, बुर्ली, बुरूंगवाडी या गावांची बैठक झाली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजपाचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, नितीन नवले, विजय पाटील, राजाराम पाटील, अंकुश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, अंकलखोपच्या सरपंच राजश्री उर्फ बेबीताई सावंत यांच्यासह पलूस तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
संजयकाका पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश सुरक्षित केला आहे. देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर आणली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रचंड प्रगती केली आहे. हा प्रगतीचा रथ असाच पुढे नेण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार येणे गरजेचे आहे. देशहितासाठी ते आवश्यक आहे. मोदींना पुन्हा आणण्यासाठी आपण सर्वांनी मला मतदान करावे. मला मत म्हणजे मोदींना दिलेलं मत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजय करावे असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.