प्रतिष्ठा न्यूज

कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाकांना पाय ठेवण्याची संधी देऊ नका : अजितराव घोरपडे, कवठेमहांकाळ येथे प्रचार सभा

प्रतिष्ठा न्यूज
कवठेमंकाळ प्रतिनिधी : भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. खोटे बोलले जात नाही, असा माझा समज होता. पण खोट्याशिवाय काहीच बोलले जात नाही. निष्क्रीय खासदारासाठी भाजप इतकी ताकद का लावत आहे, असा सवाल माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फसवणीस असा करून त्यांचे संजयकाकामध्ये काय अडकले आहे, हेच कळत नाही. संजयकाकांना कवठेमहाकांळ तालुक्यात पाय ठेवण्याची संधी देऊ नका, अशा शब्दात टीकास्त्रही सोडले.

सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ  येथे आयोजित प्रचार सभेत घोरपडे बोलत होते. यावेळी उमेदवार विशालदादा पाटील, राजवर्धन घोरपडे, गजानन कोठावळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, धनाजी पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, भारत डुबुले, वैभव नरूटे, महेश पवार, दिलीप झुरे-देशमुख, गणेश पाटील, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, अय्याज मुल्ला आदि उपस्थित होते.

अजितराव घोरपडे म्हणाले की, विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न झाले. अतिशय कमी किंमतीच्या भाजप खासदारासाठी इतकी ताकद का लावली आहे. देवेंद्र फडणवीसांचे संजयकाकांमध्ये काय अडकले आहे, या मी शोध घेतला. फडणवीस नव्हे ते तर फसणवीस आहे. संजयकाकांना कवठेमहांकाळ तालुक्यात पाय ठेवायची संधी देऊ नका. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. खोटे बोलले जात नाही, असा माझा समज होता. पण खोट्याशिवाय काहीच बोलले जात नाही. दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होईल, अशी अपेक्षा होती. पण चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. आज तरुण शेतीपासून दूर गेला आहे. त्यांना नोकऱ्या मिळल्या नाही. उद्योग, व्यापार उद्धवस्त झाली आहे. जीएसटीमुळे महागाई भडकली आहे. या जीएसटीवर केंद्र सरकार चालले आहे. तुमच्या खिशातून पैसा काढून भाजपने प्रचारासाठी वापरला आहे. जनतेच्या पैशावर डल्ला मारून हा पक्ष उभा राहिला आहे. पुढील पिढीचे भवितव्य बदलण्यासाठी भाजपला सत्तेतून हटविण्याची गरज आहे. दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले. पण एक लाखही नोकऱ्या मिळाल्या नाहीत. अग्निवीर योजना लागू करून सैन्य भरतीसाठी इच्छुक तरुणांच्या स्वप्नावर पाणी फिरविले. भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी ही चांगली संधी मिळाली आहे. जनतेने शंभरटक्के मतदान करून विशालदादांना विजयी करावे.

विशाल दादा पाटील म्हणाले की, कवठेमहांकाळमध्ये चांगले वातावरण आहे. प्रत्येकजण आपणच उमेदवार आहे, या भावनेतून प्रचार करीत आहे. भाजपला, संजयकाकांच्या पराभवाचा निर्धार केला आहे. जिल्ह्यातील आणि काही बाहेरच्या मंडळींनी माझ्याविरोधात व्यूहरचना केली होती. मला काँग्र्रेस, महाआघाडीची उमेदवारी मिळू नये, यासाठी संजयकाका पाटील तीन दिवस मठात पुजाअर्चा करीत बसल्याचे समजते. त्यांनी पुजाअर्चा केली, मला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. पण पुजा करताना त्यांनी जनतेची उमेदवारी मिळू नये, यासाठी देवाला साकडे घालायला विसरले. जनतेनेच लढण्याची ऊर्जा दिली. अजितराव घोरपडे यांनी साथ दिली. घोरपडे यांच्या रक्तातच बंड आहे. आमच्या रक्तातही बंड असल्याची आठवण घोरपडे यांनी करून दिली.

सांगलीत सारंच उलटं घडतयं

ईडी, सीबीआयच्या भीतीने अनेकजण भाजपमध्ये गेले. पण सांगलीत मात्र उलटे झाले. भाजपचे माजी आमदार अपक्षाच्या पाठिशी उभे राहिले आहे. विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे लोकप्रतिनिधींचा हात आहे. पायाखालची वाळू घसरल्याने अशी कृत्ये केली जात असल्याची टीका संजयकाका पाटील यांच्यावर केली.

*दिल्ली, उत्तरप्रदेशामधून नेते आणून भाजप प्रचार करीत आहे. उत्तरप्रदेशचे तरुण कामासाठी सांगलीत येऊ राहत आहे आणि तिथले मुख्यमंत्री आम्ही काय केले, अशी विचारणा करतात, याचे आश्चर्य वाटते.  योगी आदित्यनाथ आले, उद्या गडकरी येतील, अमित शहा, मोदी येतील. पैलवान प्रचारासाठी फौज उभी करत आहे. उद्धवठाकरे, शरद पवार यांना त्यांनी आणले आहे. अपक्षाला इतके घाबरले आहे की, प्रचाराला डोनाल्ड ट्रम्पलाही आणतील. पण आता जनता ऐकण्याची मनस्थितीत नाही, असे विशालदादा पाटील म्हणाले.*

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.