संजयकाकांना पलूस कडेगाव मधून सर्वाधिक मताधिक्य देणार : पृथ्वीराजबाबा देशमुख; दुधोंडी येथे बैठक; प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद
प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चारसौ पार हा नारा यशस्वी होण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत पलूस कडेगाव तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी रात्रीचा दिवस करू, असे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ दूधोंडी येथील बैठकीत देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. गरिबातल्या गरीब माणसाची परिस्थिती बदलण्याचं काम त्यांनी केलं आहे. देश सर्व पातळीवर प्रगती करत आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक विकास काम करण्यात आलेली आहेत. या पुढच्या काळात जिल्ह्याचा विकास वेगाने व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार येण आवश्यक आहे. मोदीजींचा आपकी बार चारसौ पार हा नारा यशस्वी होण्यासाठी आम्ही पलूस-कडेगाव मधून सर्वाधिक मते मताधिक्य देऊ. त्यासाठी आम्हाला रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल परंतु संजयकाकांना मोठ्या फरकाने निवडून आणू, असे पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले.
यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, जनतेने ज्या कामासाठी पद दिले आहे ते काम निष्ठेनं करणं हे आमचं तत्व आहे. लोकांची सेवा हेच खरं राजकारण आहे. या निवडणुकीत या भागातून मला चांगली मते मिळतील यावर माझा विश्वास आहे. संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह या भागातील सर्व पदाधिकारी माझ्यासाठी पक्षासाठी आणि मोदींसाठी परिश्रम घेत आहेत याची मला जाणीव आहे.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, भाजपा युवा मोर्चाचे रोहित पाटील, शिवाजीनाना मगर, संदीप पाटील भोगावकर, सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.