भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ होतोय ९ जून रोजी पुर्नप्रदर्शित
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नाहीय, मराठी चित्रपटांची गळचेपी होतेय म्हणून सध्या गरम असलेला विषय म्हणजे ‘टीडीएम’ चित्रपट होय. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी या अन्यायावर उठवलेल्या आवाजामुळे थेट प्रेक्षकांनीच चित्रपटाला न्याय मिळावा म्हणून या अन्याया विरुद्ध आवाज उठविला. आणि याच फळ ही चित्रपटाला मिळालं असून या चित्रपटाची एक गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. ‘टीडीएम’ हा चित्रपट पुर्नप्रदर्शित होणार असून येत्या ९ जून २०२३ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती भाऊराव कऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चित्रपटाच्या नायीका कालिंदी निस्ताने व नायक पृथ्वीराज थोरात उपस्थित होते.
भाऊराव कऱ्हाडे म्हणाले,
‘ख्वाडा’, ‘बबन’ हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आम्ही दिले. आता ‘टीडीएम’ हा चित्रपट येत असून या चित्रपटातून दोन नव्या चेहऱ्यांना मोठ्या पडद्यावर आणलं आहे. शिवाय चित्रपटाचा विषय ही वेगळ्या धाटणीचा असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होता. मात्र प्राईम टाईम नसल्याने, बऱ्याच ठिकाणी शो नसल्याने हा चित्रपट चित्रपटगृहातून काढला होता, मात्र आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचं ठरवलं आहे.
भाऊराव म्हणाले की, २८ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा आणखी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांना १५०० शो मिळाले पण आम्हाला प्रतिसाद असूनही १५० शो दिले. कलाकृतीची अवहेलना नको म्हणून चित्रपटाचे शो बंद केले. मात्र प्रेक्षकांनी आम्हाला पाठबळ मिळाले. अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी ट्रॅक्टर मोर्चे काढले. त्यामुळे आम्ही हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करत आहोत.
“मी सर्वप्रथम जनतेचे, प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे आभार मानतो. खूप मोठी घटना होती ही, यांत सर्व जनता, प्रेक्षक आणि मित्रपरिवार पाठीशी उभे राहिले त्यामुळे नवी उमेद मिळाली, आणि म्हणून “टीडीएम” येत्या ९ जूनला प्रदर्शित होतोय. एक कलाकार म्हणून जेव्हा एवढा सपोर्ट मिळतो त्यामुळे बळ वाढलंय. बऱ्याच दिग्गज मंडळींनी ही फोन करून खंबीर साथ दिली, बळ दिल. तसेच सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी ही स्वतः फोन करून खंबीर साथ दिली, पाठिंबा दर्शविला, खचून न जाता उभं राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या या प्रेमाच्या शब्दापोटी मी आज उभा आहे. मी मायबाप प्रेक्षक आणि सर्वांचाच आभारी आहे’.
सरकारने मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.