लोकहित मंचच्या मागणीनुसार विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर कार्यमुक्त – जिल्हा शल्य चिकित्सकांची कारवाई
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आवाज उठवल्याने खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील समर्थ कोलेनाड या सरपंच झालेल्या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विटा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण देश चौगुले यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम सिंह कदम यांनी कारवाई करत त्यांना कार्यमुक्त केले आहे .
समर्थ कोलेनाड या अडीच वर्षाच्या बालकाचे आई-वडील खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील एका शेतात मजुरीचे काम करतात त्याच शेतात ते राहतात 17 जून रोजी मध्यरात्री त्यांचा समर्थ या लहानग्याला एका मण्यार जातीच्या सापाने चावा घेतल्याने त्या नातेवाईकांनी विटा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी ड्युटीवर असणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण देशचौगुले हे उपस्थित नसल्याने, ड्युटीवर असणाऱ्या नर्सने त्याच्यावर कसलेही प्राथमिक उपचार न करताच त्यांना सांगलीला पाठवल्यानं तसंच ॲम्बुलन्सही उपलब्ध करून न देता खाजगी ऍम्ब्युलन्सने पाठवले. त्यातच ही ॲम्बुलन्स तासगाव येथे बंद पडल्याने उपचारास विलंब झाल्याने या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आवाज उठवत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे या डॉक्टरवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती .त्यानुसार 26 जून रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी डॉक्टर भूषण देश चौगुले यांच्यावर कारवाई करत त्यांना कार्यमुक्त केले आहे.