तासगांव येथील मानाची दहीहंडी ‘शिवनेरी’ने फोडली
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव:ढवळवेस येथील श्रीकृष्ण मित्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.उत्सवाचे हे ४५ वे वर्ष असून ही दहीहंडी जिल्ह्यातील पहिली आहे.मुंबईनंतर दहिहंडी हा खेळ सांगली जिल्ह्यात आणण्याचे श्रेय श्रीकृष्ण मित्र मंडळाला जाते.दरवर्षी येथील सुतार यांच्या घरी पारंपारीक पद्धतीने गोकुळअष्टमी साजरी करून,दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्या दिवशी दहीहंडी केली जाते.मानाची असलेली दहिहंडी “राधाकृष्ण, गोपाल कृष्ण” च्या गजरात बालगोविंदाच्या डोक्यावरून मैदानात आणून तासगांव नगर परिषदेचे प्रशासक पृथ्वीराज पाटील यांच्या शुभहस्ते दहीहंडीचे पूजन करून ती उंचावर बांधण्यात आली.यावेळी शिवनेरी गोविंदा पथकाने ध्येयमंत्र झाल्यानंतर दही हंडी फोडन्या साठी प्रयत्नाला सुरुवात केली.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ७ थरांचा मनोरा करून त्यांनी उंचीचा अंदाज घेतला आणि दोन प्रयत्नानंतर दहीहंडी फोडली. गेली ४५ वर्षे सलग सुरु असलेल्या दहिहंडी उत्सवाचे नेटके आयोजन करण्यात आले होते.श्रीकृष्ण मित्र मंडळाचे जेष्ठ सदस्य प्रताप माळी आणि संजय सुतार तसेच कु.विराज सुतार या तिघांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.गेली सुमारे ४० वर्षे रामकृष्ण काळेमामा हे दहीहंडी फोडणाऱ्या संघास रोख रक्कमेचे बक्षिस देत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी बक्षिस दिले. तसेच कै.जयवंत संजय सुतार याच्या स्मरणार्थ कुटुंबियांकडून बक्षिस देण्यात आले.या उत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन मिलींद सुतार यांनी केले.