प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ : श्री. सुनील घनवट
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत ‘मंदिरांचे सरकारी नियंत्रण आणि संघर्ष’ या विषयावर उद्बोधन सत्र !
या वेळी व्यासपिठावर ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि पुणे येथील ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे उपस्थित होते.
राजकीय आणि न्यायव्यवस्था क्षेत्रांतील काही व्यक्ती मोठेपणासाठी विश्वस्त मंडळांमध्ये येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मंदिरे ही व्यक्तीगत लाभासाठी नाहीत. जेव्हा मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे जाईल, तेव्हा मंदिरांचा विकास निश्चित होईल. देवापुढे येणारे धन आणि सोने–नाणे यांवर देवाचा हक्क आहे. मंदिरांविषयी खटले चालू झाल्यावर मात्र मंदिराचे लाखो रुपये अधिवक्त्यांच्या शुल्कासाठी खर्च होत आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे परवडणारे नाही. हे रोखले नाही, तर मंदिरातील बजबजपुरी वाढत जाईल. देवा पेक्षा कुणीही मोठे नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते तन–मन–धन अर्पण करून मंदिरांसाठी भारतभर फिरत आहेत. अशा प्रकारे सर्वांनी या कार्यात योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले.
मंदिरातील वैभव आणि प्रतिष्ठा वाढल्यानंतर मंदिर सरकारीकरणाचा डाव रचला जातो. पुजारी आणि विश्वस्त यांच्यातील अंतर्गत कलहामुळे मंदिरांचे सरकारीकरण होते; मात्र मंदिरांच्या सरकारीकरणानंतरही मंदिरांचे प्रश्न संपलेले नाहीत. उलट मंदिरांमध्ये विविध घोटाळे झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर विठ्ठल–रुक्मिणी मंदिर भक्तांच्या ताब्यात येण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे प्रतिपादन पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके यांनी केले.
मंदिरांमधील पुजारी आणि विश्वस्त यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. भीमाशंकर देवस्थानमध्ये वर्ष 1980 पासून निर्माण झालेला वाद पुढे 20 वर्षे चालला. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी मंदिराचे विश्वस्त एकत्र आले. अशा प्रकारे मंदिरांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्तांनी एकमेकांना विश्वासात घेऊन कार्य केल्यास वाद होणार नाहीत, असे प्रतिपादन पुणे येथील ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी केले.