कार कालव्यात कोसळून कुटुंबातील सहा जण ठार; मृतदेहांसमवेत रात्रभर गाडीतच बसून होती मुलगी; तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील घटना
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालया जवळ असणाऱ्या ताकारी कालव्यात अल्टो कार कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागेवरच ठार झाले असून सुदैवाने एक महिला बचावली आहे.हा अपघात (बुधवार) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.या अपघातात अभियंता राजन जगन्नाथ पाटील,सुजाता राजन पाटील (दोघे रा,तासगाव ),प्रियांका अवधूत खराडे, ध्रुवा अवधूत खराडे,कार्तिकी अवधूत खराडे (तिघे रा, बुधगाव),राजवी विकास भोसले ( रा,कोकळे ता,कवठेमहांकाळ) असे सहाजण जागेवरच ठार झाले असून, स्वप्नाली विकास भोसले (रा,कोकळे) या सुदैवाने बचावल्या आहेत.मात्र त्या जखमी झाल्या आहेत.नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वप्नाली यांच्या सासरी कोकळे येथे सर्व कुटुंबीय एकत्र आले होते.मंगळवारी रात्री वाढदिवस साजरा करून,जेवण करून नात व लेकीसह तासगाव येथे येण्यासाठी रात्री उशिराने अल्टो कार (एम एच १० ए एन १४९७) मधून सर्वजण येत होते.कार मृत राजन हे चालवत असताना कार मणेराजुरी रस्त्यावरील ताकरी कालव्याजवळ आली असता राजन यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली असे सांगण्यात येत आहे.अपघात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला असल्याने बचावलेल्या स्वप्नाली यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला,मात्र रात्रीची वेळ असल्याने अपघात झालेला कोणाला समजून आला नाही त्यामुळे मदतीसाठी कोणाला येता आले नाही,त्यामुळे जखमींना वेळेत उपचार न मिळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.सकाळी सहा वाजता मॉर्निग वॉकसाठी गेलेल्याना कालव्यातून महिलेचा आवाज येत असल्याने ही दुर्दुवी घटना घडल्याचे समजले.त्यांनी महिलेला कालव्यातून बाहेर काढले व घटनेची माहिती पोलिसांना कळविली,पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व मृतदेह कालव्यातून बाहेर काढले.याबाबत अधीक तपास पोलीस करत आहेत.
राजवीचा वाढदिवस ठरला अखेरचा..राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला,मात्र वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांच्या समवेत आजोळी जात असतानाच काळाने घाला घातला.त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली आहे या घटनेने तासगावात शोककळा पसरली आहे.